भारतीय क्रिकेट संघाचे साहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची करोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे शुक्रवारपासून मँचेस्टरमध्ये सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापुढे अनिश्चिततेचे सावट पसरले आहे. मात्र संघातील सर्व खेळाडूंच्या करोना (आरटी-पीसीआर) चाचण्यांचे अहवाल नकारात्मक मिळाल्यामुळे सामना होण्याची शक्यता बळावली आहे. असं असतानाच दुसरीकडे गुरुवारी रात्री भारतीय संघातील खेळाडूंनी घेतलेल्या बैठकीमध्ये कसोटी खेळण्यासंदर्भात खेळाडूंना रस नसल्याचं आणि करोना संसर्गाची भीती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच भारतीय खेळाडूंनी मैदानामध्ये उतरण्यास नकार दिला तर इंग्लंडला हा सामना बहाल केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. कारण इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाकडून (ईसीबी) या सामन्यासाठी हिरवा कंदील देण्यात आला आहे. म्हणूनच भारताने माघार घेतली तर इंग्लंडला विजयी घोषित केलं जाण्याची मागणी ईसीबीने याआधीच केलीय. म्हणूनच आता तीन वाजता भारतीय खेळाडू आणि बीसीसीआय काय निर्णय घेणार यावर मँचेस्टर कसोटीचं भवितव्य अवलंबून आले.

नक्की वाचा >> Ind vs Eng Test Cancelled: “त्या गुन्ह्यासाठी रवी शास्त्री आणि कोहलीला अटक करा”; संतप्त भारतीयांची मागणी

खेळाडूंची बैठक झाली

गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवलं. द इंडियन एक्सप्रेसला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचं उर्वरित पर्व खेळवलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसा उत्साही नसल्याचं म्हटलं आहे. करोना पॉझिटीव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते. सोमवारी संपलेल्या कसोटीसामन्यापर्यंत परमार या खेळाडूंसोबतच होते. नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सर्व भारतीय खेळाडू करोना निगेटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ या कसोटीबद्दल साशंक आहे.

नक्की वाचा >> “IPL साठी विराट असं करणं शक्यच नाही”; सामना रद्द झाल्यानंतर त्या एका शब्दामुळे इंग्लंड क्रिकेट बोर्डावर संतापले भारतीय चाहते

ईसीबीने केली मागणी?

एकीकडे भारताला खेळण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं जात असतानाच दुसरीकडे संघात करोनाचा शिरकाव झाल्यामुळे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मागणी गुरुवारी सायंकाळी केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने ही मागणी फेटाळून लावल्याचं सांगण्यात येत आहे. शास्त्री, अरुण आणि परमार यांना करोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत. त्यामुळे भारताने जोखीम पत्करून कसोटी खेळण्याऐवजी इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी मागणी ‘ईसीबी’च्या पदाधिकाऱ्यांनी केल्याचं सांगण्यात येतं. मात्र खेळाडूंसोबतच्या बैठकीआधी रोहित-विराट यांनी त्यांचा डाव उधळून लावल्याचं बोललं जात आहे. याशिवाय, २०२२ मधील मर्यादित षटकांच्या मालिकेवर याचे विपरित परिणाम होतील, असेही भारतीय संघ व्यवस्थापनाने ‘ईसीबी’ला कळवल्याचे समजते. पाचवी कसोटी रद्द झाली, तर भारत २-१ अशा फरकाने मालिका जिंकेल. मात्र भारताने स्वत:हून पराभव मान्य केल्यास किंवा खेळाडूंनी मैदानात उतरण्यास नकार दिल्यास इंग्लंड मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल आणि पतौडी करंडक त्यांच्याकडेच कायम राखला जाईल.

आधीच बसलाय करोनाचा फटका…

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण यांच्यानंतर परमार यांना करोनाची लागण झाल्यामुळे भारतीय क्रिकेट संघाला गुरुवारचे सराव सत्र रद्द करावे लागले. संघामधील सर्व खेळाडूंच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या. सावधगिरी म्हणून भारतीय चमूला आपापल्या खोलीत थांबण्याचे निर्देश देण्यात आले होते.  शास्त्री यांच्या संपर्कातील भारताचे मुख्य फिजिओ नितीन पटेल सध्या विलगीकरणात असल्यामुळे पाचव्या कसोटीस संघासोबत फिजिओ नसेल. क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक आर. श्रीधरसुद्धा विलगीकरणात असून, फक्त फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड संघासोबत आहेत. सर्व खेळाडू आणि मार्गदर्शकांचे लसीकरण पूर्ण झाले असले तरी इंग्लंडमध्ये जनजीवन पूर्वपदावर आल्यामुळे दोन्ही संघांमधील खेळाडू सध्या जैव-सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन करीत नाहीत. लंडनमध्ये पुस्तक प्रकाशनाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शास्त्री यांना करोनाची लक्षणे आढळून आली आहेत. या कार्यक्रमाला अरुण, पटेल आणि श्रीधर यांनीही हजेरी लावली होती.