इंग्लंडविरोधातील चौथा टी-२० सामना जिंकत भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत २-२ ने बरोबरी केली आहे. सूर्यकुमार यादवने पहिल्याच सामन्यात अर्धशतक झळकावत भारताला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात मदत केली. भारताने प्रथम फलंदाजी करताना आठ गडी गमावत १८५ धावा केल्या होत्या. इंग्लंड संघ मात्र २० षटकात ८ गडी गमावत १७७ धावाच करु शकला. यामुळे भारताने हा सामना आठ धावांनी जिंकला. दरम्यान यावेळी सामन्यात तिसऱ्या पंचांचा निर्णय चांगलाच चर्चेचा विषय ठरला. सूर्यकुमार यादव आऊट होता की नव्हता? यावर मैदान आणि मैदानाबाहेरही चर्चा सुरु आहे. यावर सूर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया दिली आहे.

“ज्याप्रकारे सर्व गोष्टी घडल्या त्याचा मला आनंद आहे. जेव्हा मी फलंदाजीसाठी गेलो तेव्हा काय करायचं हे स्पष्ट होतं. मी आर्चरला आयपीएलच्या गेल्या दोन तीन हंगामात पाहिलं आहे. मी त्याचे सर्व सामने पाहिले आहेत. नवीन फलंदाज आल्यानंतर तो काय गोलंदाजी करतो हेदेखील पाहिलं होतं. मीदेखील काही गोष्टी ठरवल्या होत्या,” असं सूर्यकुमारने सांगितलं आहे.

आणखी वाचा- ‘सॉफ्ट सिग्नल’वरुन वाद! मला कळत नाही अंपायर ‘I Don’t Know’ सिग्नल का नाही देऊ शकत : विराट कोहली

“तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणं माझ्यासाठी सूर्वणसंधी होती. ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्याचा मला आनंद आहे. माझ्या विकेटबद्दल बोलायचं गेल्यास मी नाराज नाही. कारण काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात आहेत त्यावर मी नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण हाताबाहेर असणाऱ्या गोष्टींसाठी काही करु शकत नाही,” असं त्याने सांगितलं.

आणखी वाचा- IND vs ENG: इंग्लंडविरोधातील विजयाचा शिल्पकार सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सूर्यकुमारच्या विकेटवरुन वाद
सॅम कॅरनच्या १४ व्या षटकात डेव्हिड मलानने सूर्यकुमारचा झेल घेताना हात मैदानाला टेकवले होते. पण मैदानावरील पंचांचा निर्णयच तिसऱ्या पंचांनी योग्य ठरवला. यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

विराट कोहलीने काय सल्ला दिला होता?
इशान किशन ज्याप्रकारे निर्धास्तपणे पहिल्या सामन्यात खेळत होता त्याचप्रकारे सूर्यकुमार यादवदेखील अजिबात दडपण न घेता खेळला. कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासोबत झालेल्या चर्चेला सर्व श्रेय देताना सूर्यकुमारने सांगितलं की, वरिष्ठांनी इतकी वर्ष खेळणाऱ्या एखाद्या संघासोबत खेळत असल्याप्रमाणेच खेळ असा सल्ला दिला होता.

आणखी वाचा- IND vs ENG : रोहित शर्माने १० वर्षांपूर्वी केलेली ‘ती’ भविष्यवाणी सूर्यकुमार यादवने खरी ठरवली!

“मी जसा आहे तसाच राहण्याचा प्रयत्न करत आहे, स्वत:शी बोलतो, गोष्टी साध्या ठेवणे….यामुळे मला सर्व सहज होतं. संघ व्यवस्थापन आणि विराटने मला मैदानात जाऊन स्वत:ला व्यक्त कर असं सांगितलं होतं, आयपीएलमध्ये खेळत आहेस त्याप्रमाणे खेळ, फक्त कपड्यांचा रंग वेगळा आहे,” अशी माहिती सूर्यकुमारने दिली.