Ind vs Eng : Ind vs Eng : भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेत तिसरी कसोटी १८ तारखेपासून सुरु होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. पण भारताच्या संघासाठी कर्णधार विराट कोहलीची तंदुरुस्ती हा चिंतेचा विषय आहे. पाठीच्या दुखण्याने तो या कसोटीत सहभागी होणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जर विराट कसोटीच्या दिवसापर्यंत तंदुरुस्त झाला नाही, तर अशा परिस्थितीत उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्याऐवजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्याकडे संघाचे कर्णधारपद जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडकडून अत्यंत लाजिरवाणा पराभव झाला. या विजयामुळे इंग्लंडने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात भारताने टक्कर देण्याचा प्रयत्न केला होता. पण दुसऱ्या सामन्यात भारतीय फलंदाजांनी हत्यार टाकून दिली असल्याचे दिसून आले. तसेच गोलंदाजांनीही फारसा प्रभाव पाडला नाही. दुसऱ्या सामन्यादरम्यान दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहली याच्या पाठीच्या दुखण्याने उचल खाल्ली. त्याची फलंदाजी सुरु असताना विराट कोहलीला फिजीओची गरज भासली. मैदानावर विराटवर प्राथमिक उपचार करण्यात आले. पण तो सामन्यात फारसा प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे १८ तारखेपासून होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली खेळणार कि नाही, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. जर विराट कोहली तिसऱ्या सामन्याआधी पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागी एक फलंदाज संघात खेळवावे लागेल. पण त्या बरोबरच कर्णधारपदाची धुरादेखील दुसऱ्या खेळाडूंकडे सोपवण्याची जबाबदारी निवड समितीकडे असेल. अशा परिस्थितीत सामान्यपणे उपकर्णधार अजिंक्य रहाणे याला कर्णधारपद सोपवले जाणे, हे कर्मप्राप्त आहे. पण अजिंक्य रहाणे हा सध्या आपल्या फॉर्म्सही झुंजत आहे. त्याला फलंदाजीतील त्याची लै अद्याप सापडलेली नाही. त्यामुळे त्याच्यावर कर्णधापदाची अधिक एक जबाबदारी सोपवण्याऐवजी अश्विनला ही जबाबदारी देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.