इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला. भारताचा कर्णधार विराट कोहली याला वगळता इतर फलंदाजांना मालिकेत फारसा प्रभाव पाडता आला नाही. विराटने मालिकेत सर्वाधिक ५९३ धावा केल्या. पण त्याचा हा प्रयत्न विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याच्या विक्रमाशी बरोबरी करण्यास कमी पडला.

तसे पाहता लारा आणि विराट यांची तुलना होऊ शकत नाही. कारण हे दोघेही भिन्न काळात क्रिकेटच्या रणांगणात उतरले आहेत. पण लाराने जो विक्रम १७ वर्षांपूर्वी केला होता, त्याच्या जवळपास कोहलीला पोहोचता आले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत कोहलीने सर्वाधिक ५९३ धावा केल्या. या मालिकेत भारताच्या अन्य कोणत्याही फलंदाजाला एवढ्या धावा करणे जमलेले नाही. इंग्लंडचा विचार केला तर त्यांच्याकडून सर्वाधिक धावा जोस बटलरने (३४९) केल्या आहेत. त्यामुळे कोहली आणि बटलर यांच्यामध्ये २४४ धावांचे अंतर राहिले.

वेस्ट इंडिजचा संघ जवळपास १७ वर्षांपूर्वी श्रीलंकेबरोबर कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत लाराने ६८८ धावा केल्या होत्या. श्रीलंकेकडून यावेळी सर्वाधिक धावा तिलकरत्ने दिलशानने (४०३) केल्या होत्या. यावेळी लारा आणि दिलशान यांच्यामध्ये २८५ धावांचे अंतर होते. असा हा योगायोग आता १७ वर्षांनंतर पाहायला मिळत आहे.