न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत, ५-० च्या फरकाने मालिका जिंकली. अशी कामगिरी करणारा भारत एकमेव संघ ठरला आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माने या सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं. पहिल्यांदा फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि लोकेश राहुलने महत्वपूर्ण भागीदारी रचत भारताला १६३ धावांचा पल्ला गाठून देण्यात मदत केली.

दुसऱ्या विकेटसाठी राहुल आणि रोहितने केलेल्या ८८ धावांच्या भागीदारीच एक अनोखा विक्रम या जोडीच्या नावे जमा झाला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये राहुल-रोहित जोडीने १ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला.

रोहित शर्माने या सामन्यात ४१ चेंडूत ६० धावांची खेळी केली. मात्र फलंदाजीदरम्यान रोहितच्या पोटरीतले स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. रोहितच्या अर्धशतकी खेळीत ३ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. लोकेश राहुलनेही ४५ धावा करत त्याला चांगली साथ दिली. टी-२० मालिकेचं आव्हान संपल्यानंतर भारतीय संघ वन-डे मालिकेसाठी सज्ज होणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध भारत ३ वन-डे आणि त्यानंतर २ कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

अवश्य वाचा – Ind vs NZ : रोहित शर्माची धडाकेबाज अर्धशतकी खेळी, नोंदवले ३ अनोखे विक्रम