यजमानांना सलग ३ सामन्यात धूळ चारून मालिकेत विजयी आघाडी घेणाऱ्या टीम इंडियाला चौथ्या सामन्यात मात्र न्यूझीलंडकडून अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ गडी राखून विजय मिळवला आणि भारतावर नामुष्कीची वेळ ओढवली. भारताचा डाव अवघ्या ९२ धावांवर आटोपला आणि अवघ्या १५ षटकात न्यूझीलंडने सामना खिशात घातला. या सामन्यात टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माने संघाचे नेतृत्व केले.
रोहितच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या सामन्यात संघाला हार पत्करावी लागली. या पराभवाबाबत बोलताना रोहित म्हणाला की ही आमची फलंदाजीतील अत्यंत वाईट कामगिरी होती. आम्ही अशा पद्धतीची कामगिरी करू, असे मला अजिबातच वाटले नव्हते. न्यूझीलंडच्या गोलंदाजांना याचे श्रेय दिले गेलेच पाहिजे. खेळपट्टीचा अंदाज घेऊन तशी फलंदाजी करणे गरजेचे असते, पण तसे आम्हाला करणे शक्य झाले नाही.
आमच्या अशा खेळीमुळे संघाची लाज गेली. खेळपट्टीवर आम्ही स्थिरावलो नाही. खराब फटके खेळून आम्ही बाद झालो. स्विंग चेंडू खेळताना फलंदाजांचा कस लागतो. आम्ही काही काळ खेळपट्टीवर तग धरायला हवा होता. त्यानंतर कदाचित आमची कामगिरी चांगली झाली असती, असेही रोहित म्हणाला.
दरम्यान, चौथ्या सामन्यात भारतीय डावाची सुरुवातच खराब झाली होती. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी झटपट माघारी परतली. कारकिर्दीतील २००वा सामना खेळणाऱ्या रोहित शर्माला अवघ्या ७ धावा करता आल्या. विराट कोहलीच्या जागेवर संघात स्थान मिळालेला शुभमन गिलही आपला प्रभाव पाडू शकला नाही. यानंतर एकामागोमाग एक फलंदाज बोल्ट आणि डी-ग्रँडहोमच्या जाळ्यात अडकत गेले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने १० षटकात २१ धावांत ५ तर कॉलिन डी-ग्रँडहोमने १० षटकात २६ धावांमध्ये ३ बळी घेतले. तर टॉड अस्टल आणि जिमी निशम यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. भारताकडून युझवेन्द्र चहल याने सर्वाधिक १८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2019 2:01 pm