न्यूझीलंड विरुद्ध सुरु असलेल्या एकदिवसीय मालिकेतील शेवटचे २ सामने आणि टी२० मालिका या साठी भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला विश्रांती देण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. या सामन्यांमध्ये कर्णधारपदाची धुरा सलामीवीर रोहत शर्माकडे असणार आहे. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली हा २०१८ पासून क्रिकेट मालिकांमध्ये खेळतो आहे. आशिया चषक स्पर्धा वगळता त्याला विश्रांती मिळलेली नाही. त्यामुळे कोहलीच्या एकूण शारीरिक आणि मानसिक ताणाकडे पाहता त्याला या सामन्यांसाठी विश्रांती देण्यात येणार असल्याचे BCCI ने सांगितले आहे.

गेल्या काही महिन्यात विराटवरील ताण पाहता त्याला ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याआधी पुरेशी विश्रांती मिळणे गरजेचे आहे असे मत संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने व्यक्त केले होते. त्यामुळे त्याला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे BCCI च्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

BCCI २०१८च्या सुरुवातीपासून कोहलीवर असलेला शारीरिक आणि मानसिक ताण यावर लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच कोहलीला काही सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. तसेच अफगाणिस्तानविरुद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामान्यतही त्याला विश्रांती देण्यात आली होती. याशिवाय आशिया चषक स्पर्धेतही विराटला अतिरिक्त ताणामुळे विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.