श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना आज कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वनडे मालिकेत दमदार कामगिरी केलेल्या पृथ्वी शॉने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीराने लंकेसाठी सलामीचे षटक टाकले. चमीराने ऑफस्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू पृथ्वीच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक मिनोद भानुकाच्या हातात विसावला. पृथ्वीसाठी हे टी-२० पदार्पण वाईट स्वप्नासारखे ठरले. आपल्या स्फोटक सलामीसाठी पृथ्वी ओळखला जातो. पण आजची सुरुवात त्याच्यासाठी चांगली ठरली नाही. पृथ्वीसोबत फिरकीपटू वरुण चक्रवर्तीनेही आज टी-२० पदार्पण केले आहे.

 

वनडे मालिकेत विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवनसमोर आता टी-२० मालिकाविजयाचे ध्येय आहे. दुसरीकडे दासुन शनाकाच्या नेतृत्वातील दासुन शनाकाला मागील पराभव विसरून नव्याने सुरुवात करावी लागेल. वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात विजय मिळवल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावला असेल, हे नक्की.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, यजुर्वेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार.

श्रीलंका: अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका (यष्टीरक्षक), धनंजया डी सिल्वा, चरित असालांका, दासुन शनाका (कर्णधार), अशेन बंडारा, वनिदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, इसुरु उदाना, अकिला धनंजया, दुश्मंथा चमीरा.