कर्णधार विराट कोहलीने झळकावलेल्या नाबाद ९४ धावांच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी विंडीजने दिलेलं २०८ धावांचं आव्हान भारताने ४ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी करत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी स्वैर मारा करत विंडीजला धावा बहाल केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मात्र भारतीय फलंदाजांनी आपल्या लौकिकाला जागत पहिल्या सामन्यात विजयावर शिक्कामोर्तब केलं. या विजयादरम्यान टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाने अनोखी हॅटट्रीकही केली आहे. घरच्या मैदानावर २०० पेक्षा जास्त धावांचं लक्ष्य पार करण्याची भारतीय संघाची ही तिसरी वेळ ठरली. आतापर्यंत घरच्या मैदानावर भारतीय संघाने ४ वेळा २०० पेक्षा जास्त धावांचा पाठलाग केलाय, ज्यापैकी ३ सामन्यांत भारतीय संघ विजयी ठरला आहे.

कर्णधार विराट कोहलीनेही विंडीजच्या गोलंदाजांचा समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली. त्याच्या ९४ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा यशस्वी पाठलाग करण्याच्या निकषांमध्ये विराटने आपली सरासरी १०० च्या पुढे नेऊन ठेवली आहे.

विंडीजकडून शेमरॉन हेटमायरने अर्धशतक झळकावत संघाला आश्वासक धावसंख्या उभारुन दिली. यानंतर कायरन पोलार्ड आणि एविन लुईस यांनीही त्याला मोलाची साथ दिली. उरलेल्या दोन सामन्यात विंडीजचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi 1st t20i team india creates unique record against west indies virat shines again psd
First published on: 07-12-2019 at 13:58 IST