वेस्ट इंडिजविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना २४० धावांचा डोंगर उभा केला. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी खेळी करत भारताची बाजू वरचढ ठेवली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची भागीदारी करत भारतीय संघाला भक्कम सुरुवात करुन दिली. रोहित शर्माने यादरम्यान आपलं अर्धशतकही झळकावं.

अवश्य वाचा – IND vs WI : रोहित शर्मा @ 400, अनोखी कामगिरी करणारा पहिला भारतीय फलंदाज

रोहित शर्माने ३४ चेंडूत ७१ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ५ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ५०० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय सलामीवीरांनी आक्रमक सुरुवात करत विंडीजच्या आक्रमणातली हवाच काढून घेतली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी चौफेर फटकेबाजी करत पहिल्या विकेटसाठी १३५ धावा जोडल्या. यादरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. रोहित शर्मा ७१ धावांवर माघारी परतल्यानंतर संघ व्यवस्थापनाने विराट कोहली ऐवजी ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर बढती दिली.

अवश्य वाचा – IND vs WI : घरच्या मैदानावर ‘हिटमॅन’ची फटकेबाजी, शाहिद आफ्रिदीला टाकलं मागे

मात्र पंतने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. पोलार्डच्या गोलंदाजीवर पंत भोपळाही न फोडता माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने लोकेश राहुलच्या साथीने फटकेबाजी करत भारताला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. विराटने आक्रमक फटकेबाजी करत विंडीजच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले. राहुल ९१ धावा काढून अखेरच्या षटकात माघारी परतला.