IND vs WI : विंडीजविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने २२४ धावांनी विजय मिळवला. रोहित, रायडूची वादळी खेळी आणि गोलंदाजांचा अचूक मारा या बळावर भारताने सामना जिंकत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. भारताच्या ३७७ धावांमध्ये रोहित शर्माने १६२ तर रायडूने १०० धावा ठोकल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची फलंदाजी ढेपाळली आणि त्यांना १५३ धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमद याने सर्वाधिक ३ बळी टिपले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली. शिखर धवन फारशा धावा जमवू शकला नाही. ३८ धावांवर तो माघारी परतला. विराट कोहलीदेखील १६ धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर अंबाती रायडू आणि रोहित शर्मा यांनी २११ धावांची भागीदारी केली. रोहितने १३७ चेंडूत १६२ धावा केल्या. त्यात २० चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रायडूने त्याला छान साथ देत ८१ चेंडूत १०० धावा केल्या. पण रोहित दीडशतकानंतर तर रायडू शतकानंतर लगेचच बाद झाला. धोनीदेखील २३ धावांत तंबूत परतला. अखेर शेवटच्या षटकात थोडीफार फटकेबाजी करत भारताने ३७७ धावांपर्यंत मजल मारली. केदारने ७ चेंडूत नाबाद १६ तर ४ चेंडूत नाबाद ७ धावा केल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात खराब झाली. २० या धावसंख्येवर विंडीजने हेमराज (१४), पॉवेल (४) आणि होप (०) असे ३ गडी गमावले. त्यानंतर ठराविक वेळेने विंडीजने गडी बाद होत राहिले. अनुभवी सॅम्युलस (१८), हेटमायर (१३), रोवमन पॉवेल (१), अॅलन (१०), नर्स (८), पॉल (१९) या फलंदाजांना खेळपट्टीवर जास्त काळ तग धरता आला नाही. केवळ कर्णधार होल्डरने संघर्षपूर्ण अर्धशतक केले. खलील अहमदने आणि कुलदीप यादवने ३-३, जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांनी १-१ गडी टिपला.