ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसऱ्या दिवसाअखेर विडिंजने आठ गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा संघ अद्याप 108 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवशी जाडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत सन्माजनक धावसंख्या उभारून दिल्यानंतर ईशांत शर्माने पाच बळी घेत सामन्यात भारताचे पारडे जड केले आहे.

प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य राहणे आणि रविंद्र जाडेजाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सर्व बाद 297 धावांची मजल मारली. रहाणेने 81 तर जाडेजाने 58 धावांचे योगदान दिले. भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विडिंजने सावध सुरूवात केली. सलामीवीर ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी 36 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने कँपबेलला 23 धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर ईशांत शर्माने क्रेग ब्रेथवेटला 14 धावांवर माघारी धाडले. रविंद्र जाडेजाने शमर ब्रुक्सला 36 धावांवर बाद केले. तर डेरेन ब्रावोला जसप्रीत बुमराहने 18 धावांवर पायचीत केले.

रोस्टन चेजच्या विडिंजकडून चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ईशांत शर्माने त्याला 48 धावांवर बाद करत विंडिजला खिंडार पाडले. शाय होप(24), हेटमायर(35) आणि केमर रोच(0) आपल्या लौकिकास साजेशी खेळू करू शकले नाहीत. दुसऱ्या दिवसा अखेर कर्णधार जेसन होल्डर दहा धावांवर खेळत आहे. ईशांत शर्माने पाच बळी घेतले आहेत. तर बुमराह, शामी आणि जाडेजा यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी खेळाला सुरूवात झाल्यानंतर पंत झटपट माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव लगेच कोसळणार असे वाटत होते. मात्र, जाडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत खिंड लडवली. जाडेजाने अखेरच्या तीन फलंदाजासोबत 94 धावा जोडल्या. पहिल्या दिवसाखेरिस भारताने 6 गड्यांच्या मोबदल्यात 203 धावांपर्यंत मजल मारली होती.