पुण्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट विंडीजने भारताचा ४३ धावांनी पराभव केला. २८४ धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने शतकी खेळी केली, मात्र मधल्या फळीने पुरती निराशा केल्यामुळे भारताला पराभवचा धक्का बसला. दुसरा सामना बरोबरीत सुटल्यानंतर आणि तिसऱ्या सामन्यातील मानहाणीकारक पराभवानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.

सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, ‘आम्ही चांगली गोलंदाजी केली. ३५व्या षटकापर्यंत खेळपट्टी गोलंदाजीला अनुकूल होती, पण त्यानंतर गोलंदाजी करणे थोडेसे अवघड होऊन बसले. आम्ही खरे तर जास्तीत जास्त २५०-२६० धावांचा पाठलाग करणे अपेक्षित होते, पण आम्ही जरा जास्तच धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकांमधील गोलंदाजी वगळता आम्ही चांगली गोलंदाजी केली. फलंदाजी करताना आम्हाला मोठ्या भागिदारी करता आल्या नाहीत. वेस्ट इंडिजचा संघ विजयाचा दावेदार होता. आखलेल्या योजनेनुसार आमचा खेळ झाला नाही. आंतिम ११ मध्ये हार्दिक पांड्या किंवा केदर जाधव यांच्यापैकी एक असल्यास अतिरिक्त अतिरिक्त गोलंदाज मिळतो. संघात अष्टपैलू खेळाडूचे महत्व आहे. केदार जाधवच्या निवडणीने संघ संतुलित झाला आहे. केदारच्या संघात येण्याने गोंलदाजीचे सहा पर्याय उपलब्ध होतीत.’ चौथ्या एकदिवसीय सामन्यात केदार जाधवचा अंतिम ११ मध्ये समावेश असल्याचे विराट कोहलीने स्पष्ट केले आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार आगामी सामन्यात दोन ते तीन बदल पहायला मिळू शकतात.

२८४ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव २४० धावांत आटोपला. होपच्या अर्धशतकामुळे विंडीजने २८३ धावांपर्यंत मजल मारली होती. पण विराट कोहलीने शतक ठोकूनही भारताला हे आव्हान पूर्ण करता आले नाही. या विजयाबरोबरच विंडीजने मालिका १-१ अशी बरोबरीत आणली असून आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले होते. त्यानंतर केदारनेही आपल्याला का वगळले, ते कळाले नसल्याचे सांगितले होते. मात्र, वेस्ट इंडिजविरूध्दच्या चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी केदारचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजविरूध्द होणाऱ्या टी20 मालिकेत मात्र त्याला संघात स्थान देण्यात आलेले नाही.