वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर २२ धावांनी मात केली. पावसाने व्यत्यय आणल्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर सामनाधिकाऱ्यांनी भारताला विजयी घोषित केलं. भारतीय संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात ५१ चेंडूत ६७ धावांनी अर्धशतकी खेळी करत, संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला. रोहित शर्माच्या या अर्धशतकी खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. याचसोबत रोहितने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित आता पहिल्या स्थानावर पोहचलं आहे. त्याने आपला कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणारे फलंदाज - रोहित शर्मा (९६ सामने) - २१ वेळा विराट कोहली (६९ सामने) - २० वेळा मार्टिन गप्टील (७६ सामने) - १६ वेळा ख्रिस गेल (५८ सामने) - १५ वेळा ब्रँडन मॅक्युलम (७१ सामने) - १५ वेळा रोहितने २१ वेळा केलेल्या खेळींमध्ये १७ अर्धशतक तर ४ शतकांचा समावेश आहे. याआधी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करण्याचा विक्रम रोहित आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर विभागून होता. रविवारी झालेल्या सामन्यात रोहितने हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. अवश्य वाचा - टी-२० क्रिकेटमध्ये विराट कोहलीचा विक्रम, सुरेश रैनाला टाकलं मागे