भारत आणि विंडीज यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईकर शार्दूल ठाकूरचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात शार्दूल ठाकूरला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळू शकली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यासाठी त्याला संघात स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे, असे सांगण्यात येत आहे.

पहिल्या सामन्यातही शार्दूल ठाकूर १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आले होते. मात्र त्याला वगळून उमेश यादव आणि मोहम्मद शमी या जोडीला अंतिम ११मध्ये समाविष्ट केले गेले होते. पण या दोघांना म्हणावा तसा आपल्या गोलंदाजीचा ठसा उमटवता आला नाही. दोनही डावात मिळून उमेश यादवने १४ षटके फेकली. त्यात त्याला केवळ १ बळी टिपता आला. तर मोहम्मद शमीने एकूण १२ षटके फेकून २ बळी टिपले. त्यामुळे दुसऱ्या कसोटी संघात या दोघांपैकी एकाच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

१२ खेळाडूंचा संघ – लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, शार्दूल ठाकूर

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि २७२ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे मालिकेत भारत १-०ने आघाडीवर आहे. हा सामना केवळ तीन दिवसांत संपला. त्यातही सुमारे दीड दिवस भारताने एक डाव फलंदाजी केली. उर्वरित कालावधीत विंडीजच्या संघाचे दोन डाव संपुष्टात आले होते. भारताने पहिला डाव ६४९ धावा करून अखेर घोषित केला, पण विंडीजच्या संघाला दोन्ही डावात मिळूनही तितकी धावसंख्या उभारता आली नव्हती.