टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात यजमान विंडीजला तब्बल ३१८ धावांनी पराभूत केले आणि मोठा विजय संपादन केला. ४१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचा दुसरा डाव केवळ १०० धावांमध्ये आटोपला. जसप्रीत बुमराहने ५ आणि इशांत शर्माने ३ बळी घेत भारताला विजय मिळवून दिला. दमदार फलंदाजी करणाऱ्या अजिंक्य रहाणेला सामनावीर घोषित करण्यात आले. भारताच्या विजयानंतर आजी माजी खेळाडूंसह चाहत्यांनीही टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

भारताचा माजी फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने भारताला या विक्रमी विजयाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यातही त्याने इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराह या दोघांना विजयाचे शिल्पकार म्हटले आहे. “दणदणीत विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन. वेगवान गोलंदाजांचं विशेष कौतुक! पहिल्या डावात इशांत शर्मा आणि दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह या दोघांनी दमदार कामगिरी केली”, असे सचिनने ट्विट केले.

याशिवाय क्रिकेट समालोचक, जाणकार आणि चाहत्यांनीदेखील या विजयाच्या टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, भारताच्या दुसऱ्या डावात रहाणेचे शतक (१०२) आणि हनुमा विहिरीच्या ९३ धावा या खेळीच्या जोरावर भारताने विंडीजला विजयासाठी ४१७ धावांचे अंतिम लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजच्या फलंदाजांची पुरती दैना उडाली. जसप्रीत बुमराह आणि इशांत शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे विंडीजचे फलंदाज हतबल झाले. त्यामुळे यजमान विंडीजच्या डावाची अवस्था ९ बाद ५० अशी झाली होती. शेवटच्या गड्यासाठी केमार रोच आणि कमिन्स यांनी ५० धावांची भागीदारी केली आणि विंडीजला १०० चा आकडा गाठून दिला. पण अखेर इशांत शर्माने केमार रोचला माघारी पाठवत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. विंडीजकडून केवळ तीन खेळाडूंना दोन आकडी धावसंख्या गाठता आली. त्यातही ८ व्या क्रमांकावर फलंदाजीस उतरलेल्या केमार रोचने सर्वाधिक ३८ धावा केल्या. भारतातर्फे बुमराहने ५, इशांतने ३ तर शमीने २ गडी टिपले.