विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. संघाला पाठीमागे सोडून रोहित आपली पत्नी आणि मुलीसह एकटात भारतात निघून आल्यामुळे या चर्चांना अधिक उधाण आलं होतं. विंडीज दौऱ्यावर निघण्याआधी कर्णधार विराट कोहलीने या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं सांगितलं होतं. मी प्रत्येकवेळी रोहितच्या खेळाचं कौतुक केल्याचंही विराट म्हणाला होता.

मैदानाबाहेरील या चर्चांचा रोहित-विराटच्या मैदानातील कामगिरीवर मात्र अजिबात परिणाम होताना दिसत नाहीये. दुसऱ्या वन-डे सामन्यात रोहित-विराटने ७४ धावांची भागीदारी करत सचिन-विराट जोडीचा आणखी एक विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. विराट-रोहित जोडीची वन-डे कारकिर्दीतली ही ३२ वी अर्धशतकी भागीदारी ठरली आहे. सचिन-सेहवान जोडीच्या नावावर ३१ अर्धशतकी भागीदारी जमा आहेत. भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याच्या विक्रम हा सचिन-सौरव गांगुली जोडीच्या नावावर आहे. या जोडीने ५५ अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत.

अवश्य वाचा – Ind vs WI : रोहित-विराटची जोडी ठरतेय सर्वोत्तम, जाणून घ्या ही आकडेवारी

सलामीवीर शिखर धवन स्वस्तात माघारी परतल्यामुळे भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. मात्र यानंतर विराट कोहलीने रोहित शर्माच्या साथीने संघाचा डाव सावरला. विराट-रोहितने दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. या दरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. अखेरीस रोस्टन चेसने रोहित शर्माला १८ धावांवर माघारी धाडत भारताची जमलेली जोडी फोडली.