भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान पहिली कसोटी राजकोट येथे सुरु आहे. या कसोटीत पहिल्या डावात भारताने ९ बाद ६४९ धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या फळीत अष्टपैलू रविंद्र जाडेजाने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर भारताला ही धावसंख्या उभारता आली. रविंद्र जाडेजाने तळातल्या फलंदाजांना जोडीला कसोटी क्रिकेटमधील आपले शतक साजरे केले. त्याआधी नवोदित पृथ्वी शॉ आणि कर्णधार विराट कोहली यांनीही शतक ठोकली. पण युवा यष्टीरक्षक ऋषभ पंत याचे शतक हुकले. पण माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने मात्र त्याच्या खेळीचे कौतुक केले आहे.

ऋषभ पंतने पहिल्या डावात ९२ धावा कुठल्या. विराट कोहलीच्या साथीने त्याने आपला डाव सजवला. या दोंघांनी १३३ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत ऋषभ पंतने तुफान फटकेबाजी केली. विराटाचे या भागीदारीत केवळ ३७ धावांचे योगदान होते, तर ऋषभने मात्र ९२ धावा ठोकल्या. त्याची फलंदाजी पाहून सेहवागने ट्विट करत त्याचे कौतुक केले. ‘मी (कामानिमित्त) घराबाहेर जाणार होतो. पण मनात विचार आला की ऋषभ पंतची फलंदाजी पाहू या’, अशा मजेशीर शब्दात त्याने ऋषभच्या फलंदाजीची प्रशंसा केली.

दरम्यान, ऋषभने केवळ ८४ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. त्यापैकी ६६ धावा या त्याने चौकार आणि षटकारांच्या जोरावर त्याने केल्या. त्याने ८ चौकार आणि ४ षटकार फटकावले. अनुभवी फिरकीपटू देवेंद्र बिशू याने त्याला बाद केले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नत पॉलकडे ऋषभने झेल दिला.