अँटिग्वा येथे सुरू असलेल्या सराव सामन्यात भारताने दुसऱ्या दिवशी सामन्यावर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या दिवसअखेर भारताने १ बाद ८४ धावा केल्या आणि २०० वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघावर २०० धावांची आघाडी घेतली. पहिल्या डावात संयमी खेळीसाठी ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराचे नाबाद शतक आणि रोहित शर्माचे अर्धशतक याच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघाविरुद्धचा पहिला डाव ५ बाद २९७ धावांवर घोषित केले. त्यानंतर वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश मात्र केवळ १८१ धावांवर बाद झाला.

भारताने २९७ धावांवर डाव घोषित केल्यानंतर वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. भारताच्या वेगवान गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ते हतबल ठरले. त्यांचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. उमेश यादवने १९ धावांत ३ तर इशांत शर्माने २१ धावांत ३ बळी टिपले. कुलदीप यादवनेही ३५ धावांत ३ बळी घेतले. वेस्ट इंडिज अध्यक्षीय एकादश संघाकडून कॅवेम हॉज याने सर्वाधिक ५१ धावा केल्या.

त्यानंतर भारताने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात १ बाद ८४ धावांपर्यंत मजल मारली. मयंक अग्रवाल १३ धावांवर बाद झाला. सध्या अजिंक्य रहाणे २० तर हनुमा विहारी ४८ धावांवर खेळत आहे.

त्याआधी, भारताच्या पहिल्या डावात लोकेश राहुल (३६), मयंक अग्रवाल (१२) आणि अजिंक्य रहाणे (१) हे तिघेही अपयशी ठरले. पण चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मा यांनी भारताचा डाव सावरला. पुजाराने दमदार खेळी करत शतक ठोकले आणि त्यानंतर त्याने मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय घेतला. कसोटी क्रिकेटमध्ये अद्याप फारशी चमक दाखवता न आलेल्या रोहित शर्माने या संधीचे सोने केले. त्याने चांगली खेळी करत अर्धशतक ठोकले. तो ८ चौकारांसह ६८ धावा करून बाद झाला. त्यानंतर हनुमा विहारी (नाबाद ३७) व ऋषभ पंत (३३) यांनीही पुरेसा फलंदाजीचा सराव केल्यानंतर भारताने ५ बाद २९७ धावांवर डाव घोषित केला.