भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा समावेश असणाऱ्या भारतीय संघाची अंतिम यादी निश्चित केली असून लवकरच यासंदर्भात घोषणा होणार आहे. नियमांनुसार १० सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संघांना १५ जणांचा चमूची यादी जाहीर करावी लागणार आहे. त्यानुसार पुढील एक दोन दिवसांमध्ये बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा होईल असं सांगितलं जात आहे. मात्र असं असलं तरी आज दिवसभरामध्ये या संघाची कोणत्याही क्षणी घोषणा केली जाण्याची चर्चाही क्रीडा वर्तुळात सुरु झालीय.

इनसाइड स्पोर्ट्सला बीसीसीआयच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघामधील १५ खाळाडूंची निवड झाली असून चौथ्या कसोटीनंतर संघाची घोषणा केली जाणार आहे. जर आज कसोटी सामना लवकर संपला तर रात्रीच टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा होऊ शकते असंही सांगण्यात आलं आहे. “सर्व काही कसोटी सामन्यावर अवलंबून आहे. आज किंवा उद्या यासंदर्भातील घोषणा होऊ शकते. आज सामना वेळेत संपला नाही तर उद्या घोषणा होईल. १५ जणांचा संघ निवडण्याचं काम पूर्ण झालं आहे,” असं सुत्रांनी म्हटलं आहे.

तशा भारतीय संघातील अनेक जागा या निश्चित आहेत अगदीच मोजक्या खेळाडूंबद्दल शंका असल्याने त्यांच्या निवडीसंदर्भात उत्सुकता कायम आहे. रोहित शर्मा, के. एल. राहुल हे भारतीय संघाचे सलामीवीर असतील हे जवळजवळ निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दोघांमध्ये चुरस असेल. मधल्या फळीमध्ये कर्णधार विराट कोहली, ऋषभ पंत, सुर्यकुमार यादव आणि इतर खेळाडूंचा समावेश असेल. श्रेयस अय्यरला संघात स्थान मिळतं की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मार्च महिन्यापासून अय्यर स्पर्धात्मक सामने खेळलेला नाही.

गोलंदाजीचं नेतृत्व जसप्रीत बुमराह करणार असून भुवनेश्वर कुमार, दिपक चहारसुद्धा संघात निश्चित मानले जात आहेत. युजवेंद्र चहल हा फिरकीचं नेतृत्व करेल. अष्टपैलू खेळाडूंपैकी रविंद्र जाडेजा आणि हार्दिक पांड्या यांची नावं निश्चित मानली जात आहेत. क्रृणाल पांड्यालाही संघात संधी मिळण्याची शक्यता आहे.

वॉशिंग्टन सुंदरच्या गैरहजेरीचा फायदा आर. अश्वीनला मिळू शकतो. भारताकडे उजव्या हाताने गोलंदाजी करणारा ऑफ स्पीनर नसल्याने अश्विनला संधी मिळू शकते. अश्विन हा २०१७ पासून या फॉरमॅटपासून दूर असून त्याने ५२ टी-२० सामने खेळलेत. २४ ऑक्टोबर रोजी भारत टी-२० स्पर्धेमध्ये आपला पहिला सामना खेळेल. पारंपारिक प्रतिस्पर्धी असणाऱ्या पाकिस्तानविरोधात हा सामना रंगणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडणार आहे.