नॉर्थ साऊंड (अँटिग्वा) : सलामीवीर ऋतुराज गायकवाड, प्रतिभावान शुभमन गिल यांनी साकारलेली दमदार अर्धशतके आणि नवदीप सैनीने मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ६५ धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारत ‘अ’ संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळवली. प्रथम फलंदाजी करताना ऋतुराज (नाबाद ८५) आणि गिल (६२) यांनी १५१ धावांची सलामी दिल्यामुळे भारत ‘अ’ संघाने ५० षटकांत ८ बाद २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात सैनीने ४६ धावांत पाच फलंदाजांना बाद करून विंडीज ‘अ’ संघाला ४३.५ षटकांत १९० धावांत गुंडाळले. रेमन रायफरने विंडीजतर्फे ७१ धावा करून एकाकी झुंज दिली. मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी खेळला जाईल.