बेंगळूरु : श्रीहरी नटराज, साजन प्रकाश, लिकिथ एस. पी. आणि वीरधवल खाडे यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने आशियाई वयोगट जलतरण स्पर्धेतील पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर मिडले रिले सांघिक प्रकारात भारताला नववे सुवर्णपदक जिंकून दिले.भारतीय संघाने ३:४६.४९ सेकंद अशी वेळ नोंदवत थायलंडच्या (३:४८.८९ सेकंद) संघावर मात केली. हाँगकाँगला (३:५३.९९ सेकंद) तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. श्रीहरीने बॅकस्ट्रोकमध्ये भारताला दमदार सुरुवात करून देताना ५६.५५ सेकंद अशी वेळ नोंदवली. साजनने बटरफ्लायमध्ये ५४.४० सेकंदांची वेळ गाठताना भारताची आघाडी टिकवली. मग ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये लिकिथने १:०२.४७ अशी वेळ साधली. त्यानंतर अखेरच्या टप्प्यात वीरधवनने ५३ सेकंदांच्या वेळेसह सुवर्णपदकावर नाव कोरले.