इतिहासाची पुनरावृत्ती; अमरितपाल सिंगचा सिंहाचा वाटा; उपांत्यपूर्व फेरीच्या शर्यतीत कायम

भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने त्रेहान येथे सुरू असलेल्या फिबा आशिया चॅलेंज बास्केटबॉल स्पध्रेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या चीनला पराभूत करून इतिहासाची पुनरावृत्ती केली. ‘इ’ गटातील दुसऱ्या सामन्यात भारताने ७०-६४ असा विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

यापूर्वी २०१४मध्ये वुहान येथे पार पडलेल्या आशिया चषक स्पध्रेत भारताने अमज्योत सिंगच्या दमदार कामगिरीच्या जोरावर चीनला ६५-५८ अशा फरकाने नमवण्याची किमया साधली होती.  यावेळी अमज्योतचा सहकारी अमरितपाल सिंगने संघाचा भार खांद्यावर संभाळून भारताला विजय मिळवून दिला. ‘इ’ गटात अव्वल असलेल्या चीनचा हा पहिलाच पराभव ठरला. चार सामन्यांतील भारताचा हा दुसरा विजय असून गटात ते तिसऱ्या स्थानावर आहेत. उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवण्यासाठी भारताला अव्वल चारमध्ये स्थान टिकवणे आवश्यक आहे. पुढील लढतीत त्यांच्यासमोर कझाकस्तानचे आव्हान आहे.

चीनने पहिल्या सत्रात १७-१४ अशी आघाडी घेत सामन्यावर पकड घेतली. दुसऱ्या सत्राच्या मध्यंतरापर्यंत चीनकडे ९ गुणांची आघाडी होती. मात्र तिसऱ्या सत्रात भारताने बचाव अधिक मजबूत करत चीनवर दडपण निर्माण केले. अमरित व अमज्योत यांच्या अष्टपैलू खेळाने भारताला ३१-२९ अशी अवघ्या दोन गुणांची आघाडी मिळाली. भारताच्या मजबूत बचावाने चिनी खेळाडूंना चुका करण्यास भाग पाडले व त्याचा फायदा भारतीय खेळाडूंनी उचलला. जपानच्या व्यावसायिक लीगमध्ये खेळणाऱ्या अमरितपालने विक्रमी २३ गुणांची कमाई केली.