अखेरच्या साखळी लढतीत भारताने चीनचा ४-१ असा पराभव करीत गटविजेत्याच्या थाटात पुरुषांच्या आशिया चषक कनिष्ठ हॉकी स्पध्रेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गुरुवारी ओमानशी गाठ पडणार आहे. भारताकडून मनप्रीत सिंग ज्यु.ने (५२व्या, ६७व्या) पेनल्टी कॉर्नरचे रुपांतरण करून दोन गोल केले आणि विजयात सिंहाचा वाटा उचलला. हरमनप्रीत सिंग (१६व्या) आणि अजित पांडे (३७व्या) यांनी एकेक गोल केले. चीनकडून हयफेंग गुओने ४३व्या मिनिटाला एकमेव गोल साकारला. भारताने आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात भारताकडे १-० अशी आघाडी होती, मात्र दुसऱ्या सत्रात निर्विवाद वर्चस्व गाजवले.