उत्कृष्ट सांघिक खेळ करीत भारताने जपानविरुद्धच्या दुसऱ्या हॉकी कसोटीत २-० असा विजय मिळविला. या विजयाबरोबर चार सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना बरोबरीत सुटला होता.
भारतीय खेळाडूंनी समन्वयाचा चांगला प्रत्यय घडवीत या सामन्यात वर्चस्व गाजविले. एस.के.उथप्पा याने २९ व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे भारताने पूर्वार्धात १-० अशी आघाडी घेतली होती. ४८ व्या मिनिटाला धरमवीर सिंग याने भारतास २-० अशी आघाडी मिळवून दिली. एस. व्ही. सुनील याने मारलेला फटका जपानच्या गोलरक्षकाने परतवला, तथापि धरमवीर याने शिताफीने चाल करीत हा चेंडू गोलजाळ्यात ढकलला. जपान संघाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले मात्र त्याचा फायदा घेण्यात त्यांना यश मिळाले नाही.