चीनच्या मुजोरीनंतर प्रत्यक्ष ताबारेषेवर झालेल्या संघर्षात तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांच्यासह २० भारतीय जवानांना वीरमरण आले. कर्नल संतोष बाबू यांच्या मुलीचा हृदय पिळवटून टाकणारा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शहिद वडिलांच्या फोटोसमोर उभी असलेली सहा वर्षांची चिमुकली पाहून प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. याचबाबतीत भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याने आपला राग व्यक्त शहीद भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली यानेही शहीद जवानांना त्यांच्या बलिदानाबद्दल सलाम केला. "गलवाण खोऱ्यात आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या भारतीय जवानांना सलाम! जवानांबद्दल मला मनापासून आदर आहे. जवानांएवढा निःस्वार्थ आणि धाडसी कोणीही नसतो. शहीद जवानांच्या कुटुंबीयांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. मला आशा आहे की या कठीण प्रसंगात देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचवण्याची शक्ती देवो. तसेच, शहीद जवानांना आत्म्यास शांती लाभो", असे ट्विट विराटने केले. Salute and deepest respect to the soldiers who sacrificed their lives to protect our country in the Galwan Valley. NO one is more selfless and brave than a soldier. Sincere condolences to the families. I hope they find peace through our prayers at this difficult time. — Virat Kohli (@imVkohli) June 17, 2020 गलवाण खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत भारताचे १७ जवान जखमी झाले होते. पण रात्रीच्या प्रचंड थंडीत त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला तीन आणि नंतर १७ असे २० जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनचे ४३ सैनिक या संघर्षांत मरण पावले. पूर्व लडाखमध्ये दोन्ही देशांच्या लष्कारात झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले. सेहवागनेही या प्रकरणी आपला चीनवरील रोष व्यक्त केला. “कर्नल संतोष बाबू यांनी दिलेल्या बलिदानासाठी त्यांना सलाम. एकीकडे संपूर्ण जग करोनासारख्या अतिशय भयानक व्हायरसशी लढत असतानाच चीनकडून अशा प्रकारे वर्तणूक योग्य नाही. मला आशा वाटते की चीनने लवकर सुधरावं”, अशा शब्दात सेहवागने आपला राग व्यक्त केला.