भारत-इंग्लंड कसोटी मालिका

आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीसाठी दुसरा वेगवान गोलंदाज म्हणून अनुभवी उमेश यादव आणि युवा मोहम्मद सिराज यांच्यापैकी कोणाला भारतीय संघात संधी मिळणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे. याचप्रमाणे मोटेराची खेळपट्टी यावेळी फलंदाजांसाठी नंदनवन ठरण्याची शक्यता असल्याने तिसरा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवऐवजी पुन्हा एकदा वॉशिंग्टन सुंदरलाच प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धुव्वा उडवला. अवघ्या दोन दिवसांतच ही कसोटी संपल्यामुळे खेळपट्टीवर कडाडून टीका करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर चौथ्या कसोटीसाठी फलंदाजांनाही फायदेशीर ठरेल, अशी खेळपट्टी बनवण्यात येण्याची शक्यता आहे. उभय संघांतील चौथ्या सामन्याला ४ मार्चपासून प्रारंभ होणार आहे.

तिसऱ्या कसोटीत वेगवान गोलंदाजांना फारसा घाम गाळावा लागला नाही. त्यामुळे चौथ्या लढतीतसुद्धा भारत दोन वेगवान आणि तीन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. बुमराच्या अनुपस्थितीत इशांत शर्माच्या साथीने सिराजला प्राधान्य मिळू शकते. सिराजने गेल्या काही सामन्यांत दमदार कामगिरी केली असून चेन्नईतील दुसऱ्या कसोटीतसुद्धा त्याने फिरकीपटूंसाठी पोषक खेळपट्टीवर बळी मिळवले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे मायदेशी परतणारा अनुभवी उमेश आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला असला तरी कोहलीची पसंती कोणाला मिळणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

मागील कसोटीत तिसऱ्या फिरकीपटूची भूमिका बजावणाऱ्या सुंदरला अवघे एकच षटक गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. फलंदाजीत त्याला भोपळाही फोडता आला नाही. परंतु रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या रूपात दोन प्रमुख फिरकीपटू उपलब्ध असताना संघ व्यवस्थापन फलंदाजीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने सुंदरलाच पुन्हा खेळवण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुलदीपला संघाबाहेर बसावे लागेल.

खेळपट्टीबाबतचा वाद निर्थक -रिचर्ड्स

नवी दिल्ली : भारत-इंग्लंड यांच्यातील मोटेरा येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या खेळपट्टीवरून होणाऱ्या चर्चा तसेच वादविवाद अनावश्यक असल्याचे मत वेस्ट इंडिजचे माजी फलंदाज सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी व्यक्त केले. ‘‘आशिया उपखंडातील खेळपट्टय़ा फिरकीपटूंना पोषक असतात, हे आपण वर्षांनुवर्षे पाहिले आहे. तरीही विदेशी संघ अशाप्रकारच्या तक्रारी नेहमीच करतात. किंबहुना वेस्ट इंडिजसह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड या देशांत पहिल्या सत्रापासूनच वेगवान गोलंदाजांना लाभदायक ठरणाऱ्या खेळपट्टय़ा बनवल्या जातात, अशा वेळी कोणीही एक शब्द उच्चारत नाही. इंग्लंडने पहिल्या कसोटीतील विजयानंतर फिरकीपटूंविरुद्ध हलगर्जीपणा दाखवल्यामुळेच ते मालिकेत पिछाडीवर आहेत,’’ असे रिचर्ड्स म्हणाले.

अश्विनचा एकदिवसीय संघातही

समावेश करावा -हॉग

नवी दिल्ली : भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन हा गोलंदाजीसह फलंदाजीतही उपयुक्त योगदान देत असल्यामुळे त्याचा एकदिवसीय संघातही समावेश करण्यात यावा, अशी सूचना ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने केली आहे. ‘‘अश्विनच्या एकदिवसीय संघातील समावेशामुळे भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. त्यामुळे आघाडीच्या फलंदाजांना आक्रमक फलंदाजी करण्याची मोकळीक मिळेल. भारतासाठी अश्विनचा पर्याय चांगला ठरू शकतो. अश्विन फलंदाजांना धावा करण्यापासून जखडून ठेवतो, तसेच वेळोवेळी फलंदाजांना बाद करून संघाच्या विजयात हातभार लावतो,’’ असे हॉगने सांगितले.