भारत-ऑस्ट्रेलिया याच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून प्रारंभ होणार असून अॅडलेड येथे गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात ही लढत खेळली जाणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयनं केली आहे. बीसीसीआयनं आपल्या ट्विटरवर भारतीय संघ जाहीर केला आहे. सराव सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंत आणि शुभमन गिल यांना पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे. सलामीसाठी मयांक अगरवालसोबत पृथ्वी शॉला संधी देण्यात आली आहे. फॉर्मात असणाऱ्या गिल याला वगळण्यात आल्यामुळे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज आणि एका फिरकी गोलंदाजाला संधी दिली आहे. तर हनुमा विहारीच्या रुपानं एकमेव अष्टपैलू खेळाडू संघात आहे. बुमराह, शामी आणि उमेश यादव यांच्या खांद्यावर वेगवान माऱ्याची जबाबदारी असेल. तर अनुभवी अश्विनच्या खांद्यावर फिरकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पहिल्या सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ - मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, साहा (यष्टीरक्षक), आर. अश्विन, उमेश यादव, शामी, जसप्रीत बुमराह UPDATE: Here’s #TeamIndia’s playing XI for the first Border-Gavaskar Test against Australia starting tomorrow in Adelaide. #AUSvINDpic.twitter.com/WbVRWrhqwi — BCCI (@BCCI) December 16, 2020 यांच्यावर राहणार नजर भारत : मागील यशात चेतेश्वर पुजाराची सातत्यपूर्ण कामगिरी आणि भारताचा वेगवान मारा हे घटक महत्त्वाचे ठरले होते. आगामी मालिकेपूर्वी दोन सराव सामन्यांचा अनुभव गाठीशी असलेल्या भारताच्या फलंदाजीची मदार पुजारा, अजिंक्य रहाणे आणि कोहलीवर असेल. अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माची अनुपस्थिती तीव्रतेने जाणवेल. त्यामुळे भारताच्या वेगवान माऱ्याची भिस्त जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद शमी यांच्यावर आहे. ऑस्ट्रेलिया : वॉर्नर पहिल्या कसोटीत खेळणार नसला तरी उर्वरित मालिकेसाठी तो उपलब्ध आहे. त्यामुळे धावांसाठी झगडणाऱ्या जो बर्न्ससह सलामीची चिंता ऑस्ट्रेलियाला सतावते आहे, पण आता ऑस्ट्रेलियाकडे चिवट फलंदाजी करणारा मार्नस लबूशेन हा तारणहार आहे. फक्त १४ कसोटी सामन्यांत त्याने ६३.४३च्या सरासरीने १४५९ धावा केल्या आहेत. पॅट कमिन्स आणि नॅथन लिऑन घरच्या मैदानावर प्रतिस्पर्धी फलंदाजांवर अंकुश ठेवण्यात पटाईत आहेत.