पुलवामा हल्ल्याचे पडसाद

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ डेव्हिस चषक आणि फेड चषक या दोन टेनिस स्पर्धाच्या यजमानपदाचे हक्क भारताने गमावले आहेत, अशी माहिती अखिल भारतीय टेनिस महासंघाने (एआयटीए) दिली आहे.

दरवर्षी १६ वर्षांखालील वयोगटासाठी होणाऱ्या डेव्हिस चषक स्पर्धेत जवळपास १६ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात पाकिस्तानचाही समावेश आहे. ही स्पर्धा ८ ते १३ एप्रिलदरम्यान नवी दिल्लीतील दिल्ली लॉन टेनिस असोसिएशन संकुलात होणार आहे. त्यानंतर फेड चषकाचे सामने याच मैदानावर १५ ते २० एप्रिलदरम्यान रंगणार आहेत.

‘‘भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे वातावरण कधी निवळेल, हे कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे सद्य:स्थितीत स्पर्धेचे ठिकाण बदलणेच उचित ठरेल. असे केल्याने भविष्यात भारताला प्रतिष्ठेच्या स्पर्धाच्या आयोजनाची संधी मिळू शकेल,’’ असे ‘एआयटीए’च्या उच्चस्तरीय पदाधिकाऱ्याने सांगितले.

आता या दोन्ही स्पर्धा थायलंडमधील बँकॉक येथे होणार आहेत. सर्व सहभागी स्पर्धासाठी सामानाची ने-आण हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. ‘‘या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील बहुतेक विमानतळावरील जागा व्यापली गेल्याने सामानाची ने-आण करताना खर्च वाढेल. कझाकस्तानसाठी नवी दिल्लीत पोहोचण्यासाठी तीन-चार तासांचा जास्त अवधी लागणार आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (आयटीएफ), ‘एआयटीए’ आणि आशियाई टेनिस महासंघाशी चर्चा करून या स्पर्धेचे ठिकाण बदलण्याचे आम्ही ठरवले,’’ असेही त्यांनी सांगितले.