कोणत्याही खेळाचं मैदान असो, भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये रंगणारे सामने हे नेहमी उत्कंठावर्धक होतात. मात्र सीमेपलीकडून होणारे दहशतवादी हल्ल्यांचं कारण देत गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये. आयसीसी आणि आशियाी क्रिकेट परिषदेच्या स्पर्धांमध्ये हे संघ समोरासमोर येतात. भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने पुन्हा सुरु व्हावेत यासाठी काही माजी पाक खेळाडूंनी प्रयत्न केले होते, मात्र बीसीसीआय आणि भारतीय खेळाडूंनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या होत्या. पाक क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांच्या मते भारत सरकारच्या धोरणांमुळे दोन्ही देशांत क्रिकेटचे सामने होत नाहीत.

“पाकिस्तान विरुद्ध भारत सामन्यांकडे जगभरातील चाहत्यांचं लक्ष असतं. ICC आणि ACC च्या स्पर्धांचा अपवाद वगळता दोन्ही संघ समोरासमोर येत नाहीत. भारतीय सरकारच्या धोरणांमुळे दोन्ही संघ क्रिकेट मालिका खेळत नाहीत. खरं पहायला गेलं तर जागतिक क्रिकेटच्या भल्यासाठी या दोन्ही संघांमध्ये अधिकाधिक क्रिकेट खेळवलं जाणं गरजेचं आहे. पण आम्ही आता नियोजन करताना भारताच्या मालिकेचा विचारही करत नाही”, मणी Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

काही दिवसांपूर्वी शोएब अख्तर, रमीझ राजा, शाहिद आफ्रिदी या माजी पाकिस्तानी खेळाडूंनी करोनाविरुद्ध लढ्यात निधी उभारण्यासाठी भारत-पाक मालिका खेळवण्याची मागणी केली होती. परंतू भारतीय खेळाडूंनीही ही शक्यता फेटाळून लावली होती.