करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जगभरातील क्रिकेट मालिका बंद पडल्या आहेत. लॉकडाउनमुळे आयसीसीशी संलग्न असलेल्या सर्व क्रिकेट बोर्डांना आर्थिक नुकसान होत आहे. वर्षाअखेरीस ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-२० विश्वचषकाचं आयोजनही पुढे ढकललं जाण्याची शक्यता आहे. त्यातच डिसेंबर महिन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणं अपेक्षित आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. स्थानिक ऑस्ट्रेलियान प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली असून ३ डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे.

ब्रिस्बेन, अ‍ॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी या चार मैदानांवर भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी सामने खेळतील. बॉक्सिंग डे कसोटीला २६ डिसेंबरपासून मेलबर्नच्या मैदानावर खेळवली जाईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्याचं वेळापत्रक अद्याप अधिकृतरित्या जाहीर केलेलं नाहीये, येत्या काही काळात करोनाची परिस्थिती कशी राहते यावर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. 7 news या ऑस्ट्रेलियन संकेतस्थळाने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

असा असेल टीम इंडियाचा ऑस्ट्रेलिया दौरा –

  • पहिली कसोटी, ३ डिसेंबर – ब्रिस्बेन
  • दुसरी कसोटी, ११ डिसेंबर – अ‍ॅडलेड
  • तिसरी कसोटी, २६ डिसेंबर – मेलबर्न
  • चौथी कसोटी, ३ जानेवारी – सिडनी

अ‍ॅडलेड येथे खेळवण्यात येणारा दुसरा कसोटी सामना हा गुलाबी चेंडूवर दिवस-रात्र खेळवला जाईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी काही महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारत एक कसोटी सामना दिवस-रात्र खेळेल असं मान्य केलं होतं. या दौऱ्यावर येण्यासाठी बीसीसीआयने टीम इंडिया स्वतःला ऑस्ट्रेलियात दोन आठवडे क्वारंटाइन करेल अशी अट घातली होती, मात्र यासंदर्भात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं कळतंय.