भारताने जागतिक रौप्यपदक विजेत्या नेदरलँड्सवर ३-२ असा रोमहर्षक व सनसनाटी विजय नोंदवला आणि चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत उत्साहवर्धक कामगिरी केली.
भारताने या स्पर्धेत १९८६ मध्ये नेदरलँड्सवर मात केली होती. त्यानंतर त्यांचा डच संघावर हा पहिलाच विजय आहे. जोरदार चाली व उत्कृष्ट सांघिक खेळाचा प्रत्यय घडवित भारताने हा विजय मिळविला. ३१व्या मिनिटाला एस.व्ही.सुनीलने भारताचे खाते उघडले. मात्र त्यांचा हा आनंद काही क्षणच टिकला. ३५व्या मिनिटाला डच खेळाडू मिन्क व्हॅनडर व्हर्दीनने गोल करीत १-१ अशी बरोबरी साधली. ४७व्या मिनिटांपर्यंत ही बरोबरी कायम होती. मनप्रीतसिंग (४७वे मिनिट) व रुपिंदरपाल सिंग (४८वे मिनिट) यांच्या गोलांमुळे भारताने ३-१ अशी आघाडी मिळविली. मिन्कने ५८व्या मिनिटाला डच संघाचा दुसरा गोल करीत सामन्यातील उत्कंठा वाढविली. तथापि, त्यानंतर भारतीय खेळाडूंनी डच संघाच्या चाली शिताफीने अडविल्या व शानदार विजय मिळविला.
स्पर्धेतील पहिल्या दोन पराभवामुळे भारताच्या चाहत्यांची सपशेल निराशा झाली होती. या पाश्र्वभूमीवर भारतीय खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळ केला. उपांत्यपूर्व फेरीत भारताची गाठ बेल्जियमशी पडणार आहे.