भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर यांनी दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये शिखर धवनला संघात संधी देण्यात यावी असं मत व्यक्त केलं आहे. पहिल्या सामन्यात शिखरला विश्रांती देऊन लोकेश राहुलला संधी देण्यात आली होती. या संधीचा पुरेपूर फायदा घेत लोकेश राहुलने अर्धशतकही झळकावलं, मात्र भारत या सामन्यात विजय मिळवू शकला नाही. पहिला सामना जिंकून ऑस्ट्रेलिया सध्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.

अवश्य वाचा – कांगारुंना धक्का, महत्वाचा खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर

“लोकेश राहुलचं फॉर्मात येणं आणि मयांक मार्कंडेने पहिल्या सामन्यात आश्वासक मारा करणं या गोष्टी भारतासाठी जमेच्या बाबी आहेत. दोन यष्टीरक्षकांसह मैदानात उतरलेला भारतीय संघ, क्षेत्ररक्षणात थोडी ढिसाळ कामगिरी करणार हे अपेक्षितच आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी संघव्यवस्थापन शिखरला संघात स्थान देऊन राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवू शकते.” टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या कॉलममध्ये गावसरकरांनी आपलं मत मांडलं आहे.

यावेळी गावसकरांनी उमेश यादवच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त केली. बराच अनुभव पदरी असताना उमेश यादव वन-डे क्रिकेटमध्ये आपली छाप पाडू शकला नाहीये. त्यामुळे भारताने आता उमेश यादवला पर्याय शोधण्यासाठी सुरुवात केली पाहिजे. याचसोबत दिनेश कार्तिकच्या फलंदाजीमध्येही सध्या कमी आत्मविश्वास दिसतो आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – निवड समितीबद्दल आदर, पण माझ्या कामगिरीची दखल घ्यायला हवी – अजिंक्य रहाणे