गेल्या सात दिवसांत श्रीलंकेतील करोनाग्रस्तांची संख्या वाढू लागल्यामुळे भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर करोनाचे सावट निर्माण झाले आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणू आमच्यासाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे,  असे श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅश्ले डीसिल्वा यांनी म्हटले आहे.

तीन एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांची ही मालिका याआधी जून महिन्यात खेळवण्यात येणार होती, पण करोनामुळे ती एक महिना लांबणीवर टाकण्यात आली. सद्यपरिस्थितीत श्रीलंका मंडळाने भारताविरुद्धचे सर्व सामने जैव-सुरक्षा वातावरणात कोलंबो येथे खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारताचे प्रमुख खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम लढतीसाठी इंग्लंडमध्ये व्यग्र असतील. त्यामुळे भारताने या दौऱ्यासाठी दुय्यम संघ पाठवण्याचे ठरवले आहे. याविषयी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला की, ‘‘पांढऱ्या चेंडूवर अप्रतिम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यात संधी देण्यात येणार आहे. भारताचा हा संघ वेगळा असेल.’’

करोनाच्या काळातही आम्ही इंग्लंड आणि अन्य देशांविरुद्धच्या मालिकांचे यशस्वीपणे आयोजन केले होते. भारताचा श्रीलंका दौराही आम्ही यशस्वी करून दाखवू, पण सध्या करोनाचे वाढते संकट हे आमच्यासमोरील मुख्य आव्हान असणार आहे. करोनाग्रस्तांची संख्या वाढू नये, हीच आमची इच्छा आहे.

-अ‍ॅश्ले डीसिल्वा, श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी

अडथळ्यांवर मात करीत भारताने अग्रस्थान टिकवले झ्र्शास्त्री

नवी दिल्ली : अनेक अडथळ्यांवर मात करीत भारताने जागतिक कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान प्राप्त केले आहे. या प्रवासात गुण पद्धतीत झालेल्या बदलाचाही संघाच्या कामगिरीवर कोणताही परिणाम झाला नाही, अशा शब्दांत भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी यशाचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) गुरुवारी प्रकाशित केलेल्या ताज्या सांघिक क्रमवारीत भारताने कसोटीमधील अग्रस्थान टिकवले आहे. याबाबत शास्त्रीने ‘ट्विटर’वर म्हटले आहे की, ‘‘या संघाने सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर अग्रस्थान कायम राखले आहे. संघातील खेळाडूंनी मेहनतीने हे यश मिळवले आहे. या प्रवासात नियमांत बदल झाले. परंतु भारतीय संघाने वाटेतील अनेक अडथळ्यांवर लीलया मात केली. कठीण काळात खेळाडूंनी झुंजार लढत दिली. त्यामुळेच या संघाचा मला अभिमान वाटतो.’’ ताज्या क्रमवारीत भारताने १२१ गुणांसह आघाडी घेतली आहे.