भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत एकूण पाच पदकांची कमाई केली आहे. २३ जुलैपासून सुरुवात झालेली ही स्पर्धा संपायला आता ३ दिवसांचा अवधी उरला आहे. दरम्यान अद्यापही भारताला आणखी पदके येण्याची आशा लागलेली आहे. जर असे झाल्यास ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदके मिळवण्याचा विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे. लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदके मिळवली होती. त्यामुळे टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या संख्येचा विक्रम यंदा भारत मोडणार का याकडेच सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे. टोक्यो ऑलिम्पिकच्या १८ स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. भारताकडून यावेळी १२६ स्पर्धकांनी स्पर्धेत भाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये रौप्य (मीराबाई चानू), कांस्य (पीव्ही सिंधू), कांस्य (लव्हलिना बोर्गोहेन) कांस्य (भारतीय पुरुष हॉकी संघ) पदकांवर शिक्कामोर्तब केले आहे. तर रविकुमार दहियानेही कुस्तीमध्ये निश्चित केले आहे. टोक्यो ऑलिम्पिकसाठी ३ दिवस शिल्लक असताना, भारतालाही संबंधित स्पर्धांमध्ये आणखी ७ मोठ्या पदकांच्या आशा आहेत.

भारत १९०० पासून ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेत आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सर्वप्रथम १८९६ मध्ये ग्रीसच्या अ‍ॅथेंसमध्ये पार पडली होती. त्यानंतर भारताने १९०० साली पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ८ रजत आणि १५ कांस्य पदकं पटकावली आहेत.

जाणून घ्या भारताचा ऑलिम्पिकमधील आतापर्यंतचा प्रवास

१९०० ते १९३६ ऑलिम्पिक स्पर्धा

भारताने सर्वप्रथम १९०० साली ऑलिम्पिक स्पर्धेत एक स्पर्धक पाठवला होता. नॉर्मन प्रिचर्ड यांनी पुरुषांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत आणि २०० मीटर हर्डल स्पर्धेत मेडल जिंकलं होतं. त्यानंतर भारताने प्रत्येक ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला आहे. १९२० मध्ये भारताने पहिल्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेसाठी टीम पाठवली होती. त्यात ६ अ‍ॅथलीट आणि २ कुस्तीपटूंचा समावेश होता. १९२८ पर्यंत भारताला कोणतंच पदक मिळालं नाही. त्यानंतर १९२८ मध्ये भारताच्या हॉकी संघाने अमस्टरडॅममध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत पहिल्यांदा सुवर्ण पदक पटकावलं होतं. भारताने ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, स्वित्झर्लंड आणि अंतिम सामन्यात नेदरलँडला पराभूत केलं होतं. त्यानंतर १९३२ मध्ये भारताने अमेरिकेला २४-१ ने विक्रमी फरकाने पराभूत केलं होतं. बर्लिन ऑलिम्पिक १९३६ स्पर्धेमध्ये भारताने जर्मनीला ८-१ ने पराभूत केलं होतं. त्यावेळेस भारत ब्रिटिश इंडियाकडून स्पर्धेत खेळत होता.

१९४८ ते १९६० ऑलिम्पिक स्पर्धा

स्वातंत्र्योत्तर काळात ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये भारताचा दबदबा दिसून आला. जागतिक महायुद्धामुळे ऑलिम्पिक स्पर्धा १९४८ मध्ये लंडनमध्ये आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारताने हॉकीत सुवर्ण पदक पटकावलं होतं. स्वातंत्र्यानंतर भारताचं हे पहिलं सुवर्ण पदक होतं. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने पहिल्यांदा वैयक्तिक पदक पटकावलं. कुस्तीपटू खाशबा दादासाहेब जाधव यांनी कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने दुसरं सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यानंतर १९५६ मध्येही भारताने सुवर्ण पदक पटकावलं. मात्र १९६० मध्ये भारतीय हॉकी संघाला पराभव सहन करावा लागला आणि रजत पदकावर समाधान मानावं लागलं. भारताने १९६४ टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत पुन्हा एकदा हॉकीत सुवर्ण पदक पटकावत पुनरागमन केलं. १९६८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी टीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. त्यानंतर १९७२ ऑलिम्पिक स्पर्धेतही भारताला कांस्य पदक मिळालं. १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं सुवर्ण पदक पटकावलं. भारताचं हे हॉकीमधलं शेवटचं पदक होतं.

१९९६ अटलांटा ऑलिम्पिक

१९८० नंतर थेट १९९६ मध्ये अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत लिएंडर पेसने टेनिसमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिलं. भारताला टेनिसमध्ये मिळालं हे एकमात्र पदक आहे.

२००० सिडनी ऑलिम्पिक

त्यानंतर २००० साली सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या कर्णम मल्लेश्वरीने वेटलिफ्टींग स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं होतं. कर्णम देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देणारी पहिली महिला अ‍ॅथलीट आहे.

२००४ अँथेस ऑलिम्पिक

२००४ अँथेस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज राज्यवर्धन सिंह राठोर याने मेन्स डबल ट्रॅप शूटींगमध्ये रजत पदक पटकावलं होतं. नेमबाजीतील हे भारताचं पहिलं पदक होतं.

२००८ बीजिंग ऑलिम्पिक

त्यानंतर २००८ बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने पहिलं सुवर्ण पदक पटकावलं. त्याने १० मीटर एअर रायफल कॅटेगरीत ७००.५ गुण मिळवत सुवर्ण पदक नावावर केलं. त्याचवर्षी सुशील कुमारनं कुस्तीत भारताला कांस्य पदक पटकावून दिलं. तसेच बॉक्सिंगमध्ये विजेंद्र सिंहने कांस्य पदक पटकावलं.

२०१२ लंडन ऑलिम्पिक

२०१२ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी केली. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने ६ पदकं जिंकली होती. विजय कुमारनं पुरुष गटातील जलद पिस्टल फायरिंग स्पर्धेत रजत पदक मिळवलं होतं. गगन नारंगने १० मीटर एअर रायफलमध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. सुशील कुमारने फ्रिस्टाइल ६६ किलो वजनी गटात रजत पदकावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर योगेश्वर दत्तने फ्रिस्टाइल प्रकारात ६० किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. तसेच बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि बॉक्सर मेरी कमने कांस्य पदक मिळवलं होतं.

२०१६ रियो ऑलिम्पिक

२०१६ च्या रियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताच्या पदरी फक्त दोन मेडलची भर पडली. महिला फ्रिस्टाइल ५८ किलो वजनी गटात साक्षी मलिकने कांस्य पदक मिळवलं. तर पीव्ही सिंधुने महिला एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत रजत पदक पटकावलं.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India to break post london olympic medal record how many medals have been won so far and by whom abn
First published on: 05-08-2021 at 10:38 IST