महेंद्रसिंह धोनी आणि केदार जाधवने झळकावलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने अखेरच्या वन-डे सामन्यात ऑस्ट्रेलियावर 7 गडी राखून मात केली आहे. याचसोबत भारताने 3 वन-डे सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली आहे, कसोटी मालिकेपाठोपाठ भारताने वन-डे मालिकेतही बाजी मारत ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलियातला हा पहिलाच वन-डे मालिका विजय ठरला आहे, त्यामुळे भारताच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झालं आहे. महेंद्रसिंह धोनीने 87 तर केदार जाधवने 61 धावांची खेळी केली. या दोघांनीही चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून रिचर्डसन-सिडल आणि स्टॉयनिस यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला. सामन्यात 6 बळी घेणाऱ्या युझवेंद्र चहलला सामनावीर तर दोन सामन्यात भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. याआधी अखेरच्या सामन्यात संधी मिळालेल्या फिरकीपटू युझवेंद्र चहलने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने तिसऱ्या सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. ऑस्ट्रेलियालाला 230 धावांवर रोखण्यात भारतीय संघाला यश आलं. युझवेंद्र चहलने सामन्यात 5 बळी घेत भारताचं पारडं जड राखण्यात मोठी भूमिका बजावली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्विकारलेल्या भारतीय गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. भुवनेश्वर कुमारने दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला धक्के दिले. यानंतर शॉन मार्श आणि उस्मान ख्वाजा यांनी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव सावरला. मात्र शॉन मार्श माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. युझवेंद्र चहलने ऑस्ट्रेलियाची मधली फळी आपल्या भेदक माऱ्याने कापून काढली. मधल्या फळीत पिटर हँडस्काँबने भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत अर्धशतक झळकावलं. मात्र तो माघारी परतल्यानंतर इतर फलंदाज फारसा तग धरु शकले नाहीत. अखेरीस 230 धावांत ऑस्ट्रेलियाचा संघ गारद झाला. भारताकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 6 बळी घेतले. त्याला भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीने 2-2 बळी घेत चांगली साथ दिली.