सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघावर ५१ धावांनी मात करुन ऑस्ट्रेलियाने वन-डे मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. सिडनीच्या मैदानावर ३९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ ३३८ धावांपर्यंतच मजल मारु शकला. भारताकडून विराट कोहली, लोकेश राहुल आणि अन्य फलंदाजांनी चांगले प्रयत्न केले. अपेक्षित धावगती कायम न राखल्यामुळे टीम इंडियाला ३९० धावांचं डोंगराएवढं आव्हान झेपलं नाही. यानंतर भारतीय संघानं एकदिवसीय मालिका गमावली. परंतु यानंतर मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री मात्र ट्रोल झाले.

दरम्यान, मालिका गमावल्यानंतर एका युझरनं त्यांचा एक जुना फोटो शेअर केला. या फोटोमध्ये ते मैदानातच ड्रेसिंग रूममध्ये झोपल्याचं पाहायला मिळत आहे. तर एका युझरनं रवी शास्त्री यांना नोटपॅड घेऊन कधी पॉईंट्स तयार करताना पाहिलं नसल्याचं म्हटलं. तर काही युझर्सनं भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचीदेखील आठवण काढली.

भारतीय संघाकडून शिखर धवन आणि मयांक अग्रवाल जोडीने चांगली सुरुवात केली. परंतg अर्धशतकी भागीदारी केल्यानंतर दोन्ही फलंदाज माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी मैदानावर स्थिरावण्याला प्राधान्य दिला. परंतू यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दोघांना फारसे मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. श्रेयस अय्यरला बाद करत हेन्रिकेजने भारताची जोडी फोडली, त्याने ३८ धावा केल्या. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहली यांची जोडी जमली. यादरम्यान विराटने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं.

दुसऱ्या बाजूने लोकेश राहुलही त्याला चांगली साथ देत होता. ही जोडी मैदानावर कमाल दाखवणार असं वाटत असतानाच हेजलवूडने विराटला माघारी धाडलं, त्याने ८९ धावांची खेळी केली. कोहली बाद झाल्यानंतर लोकेश राहुलनेही जबाबदारी स्विकारत पांड्याच्या जोडीने फटकेबाजीचा प्रयत्न केला. अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो देखील झॅम्पाच्या गोलंदाजीवर ७६ धावा काढून बाद झाला. यानंतर पॅट कमिन्सने एकाच षटकात जाडेजा आणि पांड्याला बाद करत भारताच्या आक्रमणातली हवाच काढली. यानंतर भारताच्या अखेरच्या फळीतले फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ३, जोश हेजलवूड आणि झॅम्पाने प्रत्येकी २ तर हेन्रिकेज आणि मॅक्सवेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.