सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहलीच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात इंग्लंडवर ८ गडी राखून मात केली आहे. आपला धडाकेबाज फॉर्म कायम राखत रोहितने या सामन्यातही शतकी खेळी केली. इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत रोहितने नाबाद १३७ धावा केल्या. इंग्लंड दौऱ्यातलं रोहितचं हे दुसरं शतकं ठरलं. विराट कोहलीसोबत रोहितने केलेल्या १६७ धावांच्या भागीदारीमुळे भारताने या सामन्यात आपलं वर्चस्व कायम राखलं. इंग्लंडने दिलेल्या २६९ या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय सलामीवीरांनी डावाची आक्रमक सुरुवात केली होती. मात्र शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने विराटच्या साथीने सामन्याची सुत्र आपल्या हाती घेतली. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत चौफेर फटकेबाजी केली. अखेर आदिल रशिदच्या गोलंदाजीवर विराट कोहली यष्टीचीत होऊन माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने लोकेश राहुलच्या साथीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. इंग्लंडकडून आदिल रशिद आणि मोईन अली यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला. त्याआधी कुलदीप यादवने घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंडला २६८ धावांवर रोखलं. कुलदीपने पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या ६ फलंदाजांना घरचा रस्ता दाखवला. नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या भारताचा निर्णय पहिल्या सत्रात काहीसा उलडला. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो या जोडीने पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. मात्र यानंतर कुलदीप यादवने इंग्लंडच्या संघाला भगदाड पाडलं. ३ बळी माघारी परतल्यानंतर बेन स्टोक्स आणि जोस बटलर जोडीने इंग्लंडचा डाव सावरत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. स्टोक्स आणि बटलर या दोघांनीही अर्धशतकी खेळी केली. मात्र हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर इंग्लंडचा डाव पुन्हा एकदा कोलमडला. यानंतर मोईन अली - आदिल रशीद जोडीने फटकेबाजी करत इंग्लंडला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. भारताकडून कुलदीप यादवने ६ बळी घेतले. त्याला उमेश यादवने २ तर युझवेंद्र चहलने १ बळी घेत चांगली साथ दिली.