कर्णधार इयॉन मॉर्गन आणि जो रुट यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने अखेरच्या वन-डे सामन्यात विजय मिळवून मालिका २-१ च्या फरकाने जिंकली आहे. भारताने दिलेलं २५७ धावांचं आव्हान इंग्लंडने ८ गडी राखून पूर्ण केलं. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर जो रुट आणि इयॉन मॉर्गन यांनी भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना केला. भारताने कमी धावसंख्येचं आव्हान दिल्यामुळे दोन्ही फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी न करता भागीदारी रचण्याकडे भर दिला. या भागीदारीच्या जोरावर दोन्ही फलंदाजांनी भारताला सामन्यात बॅकफूटवर ढकललं. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी १८६ धावांची भागीदारी केली. इंग्लंडची ही जमलेली जोडी फोडण्याचा भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रयत्न केला, मात्र त्याला यात यश लाभलं नाही. भारताच्या प्रत्येक गोलंदाजांना इंग्लंडचे फलंदाजांनी संयमाने खेळून काढलं. जो रुटने सामन्यात नाबाद १०० तर कर्णधार इयॉन मॉर्गनने नाबाद ८८ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकूरला सामन्यात एकमेव बळी मिळाला. तत्पूर्वी मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या हाराकिरीमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा संकटात सापडला. हेडिंग्लेच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारताने ५० षटकांत ८ गडी गमावत २५६ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर रोहित शर्मा या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली जोडीने भारताचा डाव सावरला. मात्र शिखर धवन माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. दुसऱ्या सामन्यात संथ खेळीमुळे टीकेचा धनी बनलेल्या महेंद्रसिंह धोनीलाही आजच्या सामन्यात फारशी चमक दाखवता आलेली नाही. अखेरच्या षटकांमध्ये शार्दुल ठाकूरने फटकेबाजी करत भारताला २५० धावांचा टप्पा ओलांडून दिला. इंग्लंडकडून डेव्हिड विली आणि आदिल रशिद यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. त्यांला मार्क वूडने १ बळी घेत चांगली साथ दिली. याआधी झालेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ अशी बाजी मारली होती. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे या मालिकेत कोणता संघ बाजी मारतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.