भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला शनिवारपासून ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या शतकाचा अपवाद वगळता एकही फलंदाज चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. विशेषकरुन संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेचं गेल्या काही सामन्यांमधलं अपयश भारतीय संघासाठी चांगलचं चर्चेचा विषय बनलं होतं. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अजिंक्य रहाणेला आपला पाठींबा दर्शवला आहे. ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अवश्य वाचा – विराट कोहली दुखापतीमधून सावरला, तिसऱ्या कसोटीत सहभागी होणार

“इंग्लंडमधील वातावरण पाहता दोन्ही संघामधले फलंदाज अपयशी ठरले आहेत. त्यामुळे कोणत्याही एका खेळाडूला संघाच्या खराब कामगिरीसाठी जबाबदार धरणं योग्य ठरणार नाही. सध्याच्या परिस्थितीत फलंदाज आपलं डोकं शांत ठेवून किती संयमाने मैदानावर टिकून राहतो याला महत्व आहे. अजिंक्य आमच्या संघाचा एक महत्वाचा आधारस्तंभ आहे, आणि यापुढेही त्याचं संघातलं स्थान महत्वाचं असणार आहे.” शास्त्री यांनी अजिंक्यची पाठराखण केली.

अवश्य वाचा – Blog: सावधान अजिंक्य रात्र वैऱ्याची आहे!

दुसऱ्या कसोटीत करण्यात आलेल्या संघनिवडीबद्दल गेल्याकाही दिवसांमध्ये चांगलीच नाराजी व्यक्त करण्यात आली होती. उमेश यादवला वगळण्याचा निर्णय फसल्याचंही शास्त्री यांनी मान्य केलं. याचसोबत वृद्धीमान साहाच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या दिनेश कार्तिकलाही विश्रांती देण्याची मागणी होत होती. नवोदीत ऋषभ पंतला संघात जागा मिळणार की नाही यावर प्रश्न विचारला असता शास्त्रींनी अधिक माहिती देणं टाळलं. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत भारतीय संघ पुनरागमन करतो का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.