अॅलिस्टर कूकने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर अखेरच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने आपलं वर्चस्व राखलं. मात्र चहापानानंतर मैदानात उतरलेल्या भारताच्या गोलंदाजांनी झटपट विकेट घेत क्षणार्धात सामन्याचं पारडं आपल्याकडे झुकवलं. इशांत शर्मा, रविंद्र जाडेजा यांच्या माऱ्यासमोर इंग्लंडचा संघ कोलमडला आणि भारताने सामन्यात पुन्हा एकदा पुनरागमन केलं. पहिल्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघातील खेळाडूंकडून तब्बल विक्रमांची नोंद करण्यात आली.

१ – एम. एस. के. प्रसाद यांच्यानंतर भारताकडून कसोटी क्रिकेट खेळणारा हनुमा विहारी हा पहिला आंध्रप्रदेशचा खेळाडू ठरला आहे. पाचव्या कसोटीत भारतीय संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याच्या जागी हनुमा विहारीला संघात संधी दिली आहे. एम. एस. के. प्रसाद सध्या भारतीय संघाच्या निवड समितीचे प्रमुख आहेत.

१ – अॅलिस्टर कूकने अखेरच्या कसोटीत पहिल्या डावामध्ये केलेलं अर्धशतक हे इंग्लंडच्या सलामीवीराने केलेलं पहिलं अर्धशतक ठरलं आहे. (गेल्या ३० डावांच्या निकषावर)

१ – लागोपाठ सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही अॅलिस्टर कूकच्या नावावर जमा झाला आहे. कूकने ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू अॅलन बॉर्डर यांना मागे टाकलं आहे.

  • अॅलिस्टर कूक (इंग्लंड)१५९ कसोटी
  • अॅलन बॉर्डर (ऑस्ट्रेलिया) – १५३ कसोटी
  • मार्क वॉ (ऑस्ट्रेलिया) – १०७ कसोटी
  • सुनील गावसकर (भारत) – १०६ कसोटी
  • ब्रँडन मॅक्युलम (न्यूझीलंड) – १०१ कसोटी

१ – मार्क टेलर यांच्यानंतर ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये सर्व नाणेफेक जिंकणारा जो रुट हा पहिला कर्णधार ठरला आहे.

३ – पाचही वेळा नाणेफेक हरणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराट कोहली तिसऱ्या स्थानावर. याआधी लाला अमरनाथ १९४८-४९ सालात वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत सर्व सामन्यांमध्ये नाणेफेक हरले होते. १९८२-८३ सालात कपिल देवही वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत सर्व नाणेफेक हरले होते.

३० – भारताविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्यांच्या यादीत अॅलिस्टर कूक पहिल्या स्थानी. कूकने आतापर्यंत भारताविरुद्ध ३० कसोटी सामने खेळले आहेत. कूकने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगच्या २९ कसोटी सामन्यांच्या विक्रमाला मागे टाकलं आहे.

४३ – इंग्लंडविरुद्ध कसोटीत सर्वाधिक बळी मिळवण्याच्या कपिल देव यांच्या विक्रमाशी इशांच शर्माची बरोबरी. दोघांच्याही खात्यात ४३ बळी जमा आहेत.

५८ – आतापर्यंतच्या कसोटी मालिकेत भारताच्या जलदगती गोलंदाजांनी ५८ बळी घेतले आहेत. १९७९-८० सालात पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यातही भारतीय जलदगती गोलंदाजांनी ५८ बळी घेतले होते.