सलामीवीर शिखर धवनने दुसऱ्या विकेटसाठी कर्णधार विराट कोहलीसोबत केलेल्या भागीदारीच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडवर 8 गडी राखून मात केली. विजयासाठी दिलेलं 156 आव्हान भारताने 2 गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं. न्यूझीलंडला झटपट गुंडाळण्यात यशस्वी झाल्यानंतर, रोहित शर्मा आणि शिखर धवन या सलामीवीरांच्या जोडीने भारतीय डावाची धडाक्यात सुरुवात केली. मधल्या काही षटकांदरम्यान प्रखर सुर्यप्रकाराशामुळे सामना थांबवण्यात आला होता. यामुळे सामन्यातलं एक षटक कमी करुन भारताला विजयासाठी दिलेल्या आव्हानात एक धाव कमी करण्यात आली. दरम्यान चांगल्या सुरुवातीनंतर रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर शिखरने विराटच्या साथीने भारतीय डावाला आकार दिला. यादरम्यान शिखर धवनने अर्धशतकही झळकावलं, त्याने 75 धावा केल्या. विराट कोहलीनेही त्याला उत्तम साथ दिली, मात्र सामना जिंकायला अवघ्या काही धावा शिल्लक असताना तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याचं अर्धशतक 5 धावांनी हुकलं. त्याआधी मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि अन्य भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात न्यूझीलंडला 157 धावांवर रोखलं. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मार्टीन गप्टील आणि कॉलिन मुनरो शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतले. यानंतर एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतत असताना कर्णधार केन विल्यमसनने दुसऱ्या बाजूने आपल्या संघाची बाजू लावून धरली. विल्यमसनने 81 चेंडूत 7 चौकारांसह 64 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूने एकही फलंदाज आपल्या कर्णधाराला साथ देऊ शकला नाही. भारताकडून कुलदीप यादवने 4 तर मोहम्मद शमीने 3 फलंदाजांना माघारी धाडलं. या दोघांना युझवेंद्र चहलने 2 तर केदार जाधवने 1 विकेट घेत चांगली साथ दिली. या मालिकेतला दुसरा सामना 26 जानेवारी रोजी होणार आहे.