सलामीवीर लोकेश राहुलचं अर्धशतक आणि त्याला कर्णधार विराट कोहलीने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या टी-२० सामन्यात विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडने विजयासाठी दिलेलं २०४ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखत पूर्ण केलं. लोकेश राहुलने या सामन्यात ५६ तर विराट कोहलीने ४५ धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरनेही अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत नाबाद ५८ धावा केल्या. पहिल्या सामन्यातील विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडीही घेतली आहे. भारतीय डावाची सुरुवात खराब झाली, सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी संयमी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी योग्य चेंडूवर फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. लोकेश राहुलने यादरम्यान आपलं अर्धशतकही साजरं केलं. ५६ धावांवर राहुल इश सोधीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये विराट माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यर आणि मनिष पांडे यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याआधी, कर्णधार केन विल्यमसन आणि सलामीवीर कॉलिन मुनरो आणि अनुभवी रॉस टेलर यांनी झळकावलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात २०३ धावांपर्यंत मजल मारली. घरचा हंगाम गाजवल्यानंतर न्यूझीलंडच्या मैदानावर भारतीय गोलंदाजांचा खऱ्या अर्थाने कस लागला, मात्र मधल्या सत्रात भारतीय गोलंदाजांनीही दमदार पुनरागमन केलं. मुनरोने ५९, टेलरने नाबाद ५४ तर विल्यमसनने ५१ धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय पुरता चुकला. सलामीवीर कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील या जोडीने सुरुवातीच्या षटकांपासून फटकेबाजी सुरु केली. न्यूझीलंडमधील छोट्या मैदानांचा फारसा अंदाज न आल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये स्वैर मारा केला. सलामीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली. शिवम दुबेने मार्टीन गप्टीलला माघारी धाडण्यात यश मिळवलं, आणि न्यूझीलंडला पहिला धक्का बसला. यानंतर कॉलिन मुनरोने कर्णधार विल्यमसनच्या साथीने धावांचा ओघ वाढवत आपलं अर्धशतक झळकावलं. शार्दुल ठाकूरने त्याला माघारी धाडल्यानंतर कर्णधार विल्यमसनने जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत फटकेबाजीला सुरुवात केली. विल्यमसनही अर्धशतक झळकावल्यानंतर माघारी परतला. मधल्या षटकांमध्ये भारतीय गोलंदाजांनी चांगलं पुनरागमन केलं, मात्र न्यूझीलंडच्या धावगतीवर अंकुश ठेवण्यात ते अपयशी ठरले. अनुभवी रॉस टेलरनेही शेवटच्या षटकांत भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत अर्धशतक झळकावलं. त्याने नाबाद धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.