कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाला अखेरीस आपल्या पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने भारतावर १० गडी राखून मात केली. एका क्षणाला भारतीय संघाला डावाने पराभव स्विकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी ही नामुष्की टाळली. दुसऱ्या डावात भारतीय संघाने न्यूझीलंडला केवळ ९ धावांचं आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला मालिकेत १-० अशी आघाडी मिळवून दिली आहे. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांनी पुरती निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे भारतीय संघ दुसऱ्या डावात फक्त १९१ धावांपर्यंत मजल मारु शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघं ९ धावांचं आव्हान मिळालं. तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघ ३९ धावांनी पिछाडीवर होता. त्यामुळे चौथ्या दिवशी भारतीय फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला भारतावर डावाने पराभव स्विकारण्याची वेळ आलेली होती. मात्र अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत भारताचा लाजिरवाणा पराभव टाळला. मात्र न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर हे फलंदाजही फारवेळ तग धरु शकले नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने आक्रमक क्षेत्ररक्षण लावत भारतीय फलंदाजांना धावा करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने ५ तर ट्रेंट बोल्टने ४ बळी घेतले. याव्यतिरीक्त डी-ग्रँडहोमला एक बळी मिळाला.