भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील वेलिंग्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचं अखेरचं सत्र पावसामुळे वाया गेलं आहे. चहापानाच्या सत्रापर्यंत भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावांपर्यंत मजल मारली होती. मात्र चहापानानंरच्या सत्रानंतर पावसाने सामन्यात हजेरी लावल्यामुळे उरलेल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. पहिल्या सत्राअखेरीस भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावांपर्यंत मजल मारली होती. या सत्रानंतर मयांक अग्रवाल ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर हनुमा विहारीही जेमिसनच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र अजिंक्य रहाणेने एकाकी झुंज देत भारताचं आव्हान कायम राखलं आहे. आपला पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या जेमिसनने भारतीय संघाला धक्के दिले. त्याआधी, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि सलामीवीर मयांक अग्रवाल यांनी पहिल्या सत्रात केलेल्या संयमी खेळामुळे भारताने आपला डाव सावरला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेलिंग्टनच्या खेळपट्टीवरील गवत आणि वाऱ्यामुळे सुरुवातीच्या काही षटकांमध्ये भारतीय फलंदाजांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यातच आपला पहिला सामना खेळणाऱ्या जेमिसनने भारतीय संघाला दणके दिले. मात्र अजिंक्य आणि मयांकने खेळपट्टीवर तग धरत भारताचा डाव सावरला. सुरुवातीच्या षटकांमध्ये पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल या जोडीने भारतीय डावाची सावध सुरुवात करण्याकडे भर दिला. मात्र टीम साऊदीने पृथ्वी शॉचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. वेलिंग्टनची खेळपट्टी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगली साथ देत होती, याचा फायदा घेत जेमिसनने सुरेख मारा करत भारतीय फलंदाजांना कात्रीत पकडलं. चेतेश्वर पुजारा यष्टीरक्षक वॉटलिंगकडे झेल देत माघारी परतला, यानंतर कर्णधार विराट कोहलीही अवघ्या २ धावा काढत माघारी परतला. मात्र यानंतर अजिंक्य आणि मयांकने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली.