नवीन वर्षात आपला पहिला परदेश दौरा खेळणाऱ्या भारतीय संघाने इतिहासाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत भारताने न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १६४ धावांचं आव्हान यजमान संघाला पेलवलं नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत चांगले प्रयत्न केले, मात्र मोक्याच्या क्षणी भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली. भारतीय गोलंदाजांनी सामन्याची सुरुवात आक्रमक पद्धतीने केली. अवघ्या १७ धावांत न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र यानंतर टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचं पारडं आपल्या बाजूने फिरवलं. या दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर तर दोन्ही फलंदाजांनी ३४ धावा कुटल्या. मात्र नवदीप सैनीने सेफर्टला माघारी धाडत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. अर्धशतकवीर सेफर्ट माघारी परतल्यानंतर, नेहमीप्रमाणेच न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. एकामागोमाग एक विकेट फेकत न्यूझीलंडने सोपं आव्हान कठीण करुन ठेवलं. टेलरने एका बाजूने बाजू सांभाळत आपलं अर्धशतक झळकावलं खरं, मात्र तो देखील सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. इश सोधीने शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या शेपटाला फारसं वळवळण्याची संधी न देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला. त्याआधी, कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर लोकेश राहुलच्या आक्रमक खेळाच्या जोरावर भारताने अखेरच्या टी-२० सामन्यात १६३ धावांपर्यंत मजल मारली . विराट कोहलीला विश्रांती देत भारतीय संघ व्यवस्थापनाने रोहितकडे संघाचं नेतृत्व सोपवलं. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र डावाची सुरुवात चांगली झाली नाही. अखेरच्या षटकांमध्येही न्यूझीलंडने टिच्चून मारा करत भारतीय फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. न्यूझीलंडकडून कुगलेजनने २ तर हमिश बेनेटने १ बळी घेतला. युवा फलंदाज संजू सॅमसनने अखेरच्या सामन्यातही निराशा केला. केवळ २ धावा काढून कुगलेजनच्या गोलंदाजीवर सॅमसन माघारी परतला, मात्र यानंतर लोकेश राहुल आणि कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी ८८ धावांची भागीदारी केली. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारुन देणार असं वाटत असतानाच राहुल ४५ धावांवर माघारी परतला. राहुल माघारी परतल्यानंतर भारताची धावगती मंदावली. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी श्रेयस अय्यरवर दबाव टाकत त्याला मोठे फटके खेळायला दिले नाहीत. दरम्यान, रोहित शर्माने दरम्यानच्या काळात आपलं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमावण्यात भारताचे फलंदाज अपयशी ठरले. ६० धावांवर खेळत असताना रोहित शर्माच्या पोटरीचे स्नायु दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. याचा फायदा घेत न्यूझीलंडने भारतावर आणखी दबाव टाकला. शिवम दुबेही फटकेबाजी करण्याच्या नादात माघारी परतला. अखेरीस मनिष पांडे आणि श्रेयस अय्यरने भारताला १६३ धावांपर्यंतचा पल्ला गाठून दिला.