भारताचा डावखुरा फिरकीपटू ‘चायनामन’ गोलंदाज कुलदीप यादवने काल झालेल्या पहिल्या वन-डे सामन्यात महत्वाची भूमिका बजावली. युझवेंद्र चहलच्या साथीने दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचं मोठं काम कुलदीप यादवने केलं. काल कुलदीपने सामन्यात सर्वाधिक ३ बळी घेतले. मात्र कुलदीप यादवने आपल्या या यशात महेंद्रसिंह धोनीचा तितकाच वाटा असल्याचं म्हणलं आहे.

“दक्षिण आफ्रिकेत मी पहिल्यांदा खेळत असल्यामुळे मी सुरुवातीला थोडासा घाबरलेला होतो. नेमक्या कोणत्या दिशेवर चेंडूचा टप्पा ठेवायचा हे मला समजतं नव्हतं. मात्र अशावेळी महेंद्रसिंह धोनीने यष्टींमागून मला चेंडूचा टप्पा कुठे ठेवायचा हे सांगितलं. यानंतर माझ्या गोलंदाजीदरम्यान प्रत्येकवेळा ‘माही भाई’ मला सुचना करत होते. यामुळे माझं काम सोपं होऊन गेलं.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत कुलदीप यादव बोलत होता.

अवश्य वाचा – डरबन वन-डे सामन्यात तब्बल १४ विक्रमांची नोंद, कर्णधार विराट कोहलीचं आक्रमक शतक

कुलदीप यादवने पहिल्या वन-डे सामन्यात १० षटकांचा निर्धारीत कोटा पूर्ण करत, ३४ धावांच्या मोबदल्यात ३ गडी टिपले. यामध्ये जे.पी.ड्युमिनी, डेव्हिड मिलर आणि ख्रिस मॉरिस या फलंदाजांचा समावेश होता. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलच्या कामगिरीच्या जोरावर भारताने आफ्रिकेला २६९ धावांवर रोखलं. या विजयासह भारताने ६ वन-डे सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.