भारताविरुद्धची कसोटी मालिका श्रीलंकेने २-० अशी गमावली आहे. उद्यापासून पल्लकेलेत या मालिकेतल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीला सुरुवात होत आहे. या मालिकेत श्रीलंकेच्या खेळाडूंची कामगिरी फारशी चमकदार झाली नसली, तरी एका कारणामुळे श्रीलंकेचा संघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. पहिल्या दोन कसोटीत ड्रिंक्स ब्रेकदरम्यान श्रीलंकेच्या संघाला पाणी पाजण्यासाठी खास महिला मैदानात उतरल्या होत्या. श्रीलंकेच्या संघाशी निगडीत असलेल्या ITW या कंपनीचे मालक भैरव शांथ यांनी यापाठीमागचं कारण सांगितलं. "आमच्या परंपरेशी निगडीत काही गोष्टींमध्ये आम्हाला बदल करायचे होते. तसचं मैदानात खेळाडूंमध्ये एक उत्साह निर्माण व्हावा याकरता काहीतरी नवीन गोष्ट करण्याचं आमच्या मनात होतं. यावरुनचं आम्हाली ही कल्पना मिळाली, आणि आम्ही तिचा मैदानात वापर केला." क्रिकेटच्या सामन्यात महिलांनी मैदानात ड्रिंक्स घेऊन येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी १९३८ साली इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात हेडिंग्ले येथील मैदानात खेळवल्या गेलेल्या कसोटीत अशाच प्रकारे महिलांनी खेळाडूंना चहा पाजला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी कसोटी उद्या पल्लकेले येथे खेळवली जाणार आहे. त्यामुळे या कसोटीत विजय संपादन करुन भारत मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवतो का हे पहावं लागणार आहे.