मधल्या फळीतल्या फलंदाजांनी केलेल्या संयमी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्याच्या पहिल्याच टी-२० सामन्यात विजय मिळवला आहे. विजयासाठी दिलेलं ९६ धावांचं माफक आव्हान पूर्ण करताना भारताला ६ गडी गमवावे लागले. मात्र मधल्या फळीत कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजा यांनी फटकेबाजी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेस्ट इंडिजप्रमाणे भारतीय डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर शिखर धवन कोट्रेलच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र सुनिल नरिनने रोहित शर्मा आणि ऋषभ पंतला लागोपाठच्या चेंडूवर माघारी धाडत भारताला बॅकफूटवर ढकललं. यानंतर मनिष पांडेने कर्णधार विराट कोहलीसोबत छोटेखानी भागीदारी रचली. विराट-मनिष पांडे जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच किमो पॉलने मनिष पांडेचा त्रिफळा उडवला. त्यानंतर ठराविक अंतराने विराट कोहलीही कोट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. निम्मा संघ माघारी परतल्यामुळे भारतीय संघ काहीकाळ अडचणीत वाटत होता. मात्र कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजाने फटकेबाजी करत संघाची अधिक पडझड न होऊ देता भारताला विजयपथावर आणलं. विजयासाठी अवघ्या ७ धावा शिल्लक असताना कृणाल पांड्या किमो पॉलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. यानंतर वॉशिंग्टन सुंदरने षटकार खेचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. वेस्ट इंडिजकडून शेल्टन कोट्रेल, किमो पॉल आणि सुनिल नरिन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्याआधी, भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पहिल्याच टी-२० सामन्यात विंडीजचा डाव कोलमडला. अमेरिकेतील प्लोरिडा शहरात खेळवण्यात आलेल्या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या नवोदीत गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ ९५ धावांपर्यंतच मजल मारु शकला. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरने पहिल्याच षटकात कँपबेलला माघारी धाडलं. यानंतर भुवनेश्वरने दुसरा सलामीवीर एविन लुईसचा त्रिफळा उडवत भारताला दुसरं यश मिळवून दिलं. निकोलस पूरन आणि कायरन पोलार्ड यांनी काही क्षणांसाठी फटकेबाजी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र नवदीप सैनीने आपल्या पहिल्याच षटकात निकोलस पूरन आणि शिमरॉन हेटमायरला माघारी धाडत विंडीजला बॅकफूटवर ढकललं. यानंतर मैदानात आलेलाल रोव्हमन पॉवेलही खलिल अहमदच्या गोलंदाजीवर माघारी परतला. कर्णधार कार्लोस ब्रेथवेट आणि पोलार्डने भारतीय गोलंदाजीचा सामना करत विंडीजचा डाव काही प्रमाणात सावरला. मात्र ब्रेथवेट आणि सुनिल नरिन माघारी परतल्यानंतर विंडीजचा डाव पुन्हा एकदा संकटात सापडला. अखेरीस कायरन पोलार्डने आपल्या अनुभवाचा फायदा घेत, तळातल्या फलंदाजांना सोबत घेऊन संघाला ९५ धावांचा टप्पा गाठून दिला. पोलार्डने ४९ धावांची खेळी केली. भारताकडून नवदीप सैनीने ३, भुवनेश्वर कुमारने २ बळी घेतले. त्यांना वॉशिंग्टन सुंदर, खलिल अहमद, कृणाल पांड्या आणि रविंद्र जाडेजाने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.