वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यातही भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर बाजी मारली आहे. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना १६७ धावांपर्यंत मजल मारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १५.३ षटकांत ९८ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना थांबवण्यात आला. डकवर्थ लुईस नियमानुसार वेस्ट इंडिजच्या संघाला १२० धावा करणं गरजेचं होतं. मात्र यजमान संघ हे लक्ष्य पार करु शकला नाही. अखेरीस भारताने २२ धावांनी सामन्यात बाजी मारली. भारताकडून कृणाल पांड्याने २ तर वॉशिंग्टन सुंदर आणि भुवनेश्वर कुमारने १-१ बळी घेतला. त्याआधी, सलामीवीर रोहित शर्माच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर, भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात १६७ धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारतीय सलामीवीरांनी सार्थ ठरवला. मात्र त्यानंतर भारतीय डावाला गळती लागली. मधल्या फळीतले फलंदाज अपेक्षेप्रमाणे धावा जोडू शकले नाहीत. विंडीजकडून थॉमस-कॉट्रेल जोडीने अखेरच्या षटकांमध्ये भेदक मारा केला. अवश्य वाचा - Ind vs WI : ख्रिस गेलला धोबीपछाड देत रोहित ठरला टी-२० मध्ये षटकारांचा बादशहा रोहित-शिखर जोडीने पहिल्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. भारतीय सलामीवीरांची फलंदाजी पाहता भारत मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं. मात्र किमो पॉलने शिखर धवनचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला. यानंतर रोहित शर्माने कर्णधार विराटच्या साथीने काहीकाळ डाव सावरला. यादरम्यान रोहितने आपलं अर्धशतकही साजरं केलं. मात्र अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात थॉमसच्या गोलंदाजीवर तो झेलबाद होऊन माघारी परतला. त्याने ५१ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. यानंतर भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. ऋषभ पंतही सलग दुसऱ्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरला. थॉमसच्या गोलंदाजीवर पोलार्डकडे झेल देत पंत माघारी परतला. कर्णधार विराट कोहलीही उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात कॉट्रेलच्या गोलंदाजीवर माघारी परतला. मनिष पांडेही झेलबाद होऊन माघारी परतल्यामुळे मोक्याच्या क्षणी भारत धावा जमवू शकला नाही. अखेरीस कृणाल पांड्याने रविंद्र जाडेजाच्या साथीने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत भारताला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. वेस्ट इंडिजकडून ओश्ने थॉमस, शेल्डन कॉट्रेल यांनी प्रत्येकी २-२ तर किमो पॉलने एक बळी घेतला.